छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, या ठिकाणी किमान साडेचार मीटर उंचीचा भुयारी मार्ग पाहिजे होता. रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मिळून अवघ्या साडेतीन मीटरचा मार्ग तयार केला. त्यामुळे यातून मोठी वाहने ये-जा करू शकत नाहीत. मोठ्या वाहनांना किमान चार किमीचा फेरा घ्यावा लागत आहे. चुकीने या ठिकाणी मोठी वाहने आल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
सातारा-देवळाई भागात नागरी वसाहतींची संख्या झपाट्याने वाढत आहे. या भागात सध्या किमान ३५ ते ४० हजारांपर्यंत लोकसंख्या पोहोचली आहे. नागरिकांना महापालिकेचे पाणी मिळू लागल्यास या भागात प्लॉट शिल्लक राहणार नाहीत. भविष्याचा विचार करता शिवाजीनगर येथे रेल्वे उड्डाणपूलच हवा होता. शासकीय यंत्रणांनी असे न करता मनमर्जीप्रमाणे रेल्वे अंडरपास तयार केला. अत्यंत छोट्या पद्धतीचा हा अंडरपास असून, त्यातही पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा नाही. त्यामुळे शहरवासीयांनी टीकेची झोड उठविली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई प्रस्तावित केलेली नाही. भुयारी मार्गाच्या भोंगळ कामामुळे महापालिकेतील निवृत्त शहर अभियंत्यांनी दोषींना मूर्खात काढले. पावसाळ्यात पुन्हा भुयारी मार्गात पाणी, चिखल साचणार हे निश्चित.
भुयारी मार्गाची उंची किती असावी?पादचाऱ्यांसाठी साधारणतः २.२ मीटर (७.२ फूट).लघू वाहने (दुचाकी, चारचाकी) : २.५ ते ३.५ मीटर. (११ फूट)जड वाहने (बस, ट्रक) यासाठी : ४.५ मीटरपेक्षा जास्त हवी. (१४ फूट)
कोणती वाहने ये-जा करू शकतात?साडेचार मीटर उंचीचा भुयारी मार्ग असेल तर मोठी वाहनेही सहजपणे ये-जा करू शकतात. शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाची उंची फक्त ११ फूट असल्याने बस इ. वाहने येऊ शकत नाही. माहीत नसलेले मोठे वाहनधारक दररोज येथे येऊन फसत आहेत.