मान्सूनच्या सर्वदूर सरी
By Admin | Updated: June 19, 2014 23:54 IST2014-06-19T23:54:24+5:302014-06-19T23:54:24+5:30
उस्मानाबाद : मान्सूनचे आगमन लांबल्याने चिंतेत असलेल्या तुळजापूर तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना गुरूवारी दुपारी झालेल्या पावसाने काही अंशी दिलासा दिला़

मान्सूनच्या सर्वदूर सरी
उस्मानाबाद : मान्सूनचे आगमन लांबल्याने चिंतेत असलेल्या तुळजापूर तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना गुरूवारी दुपारी झालेल्या पावसाने काही अंशी दिलासा दिला़ तुळजापूर परिसर वगळता जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून, पेरणीसाठी सज्ज असलेल्या बळीराजाचे लक्ष अद्यापही मोठ्या पावसाकडे आहे़
बदलत्या हवामानामुळे गत तीन वर्षापासून शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे़ चालू वर्षी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे ‘न भूतो, न भविष्यती’ असे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले़ या नुकसानीतून उभारी घेत शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत़ मात्र, यंदाही मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकऱ्यांसह सर्वांसमोरील चिंतेचे वातावरण कायम आहे़
दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागात गुरूवारी दुपारी मृगनक्षत्रातील पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली़ तुळजापूर शहर व परिसरासह उमरगा तालुक्यातील येणेगूर व जेवळी परिसरात जवळपास पाऊण ते एक तास दमदार पाऊस झाला़ या परिसरातील ओढ्यांसह नदी, नाले भरून वाहिली़ तर विद्युत पोल उन्मळून पडल्याने बराच वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता़
त्याचप्रमाणे उस्मानाबाद, उमरगा, लोहारा, भूम, परंडा आदी तालुक्याच्या परिसरात गुरूवारी दुपारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला़ तसेच कळंब शहरासह येरमाळा, मोहा, ईटकूर परिसरातही पावसाने हजेरी लावली़ कळंब तालुक्यातील वाकडी, हावरगाव, आंदोरा शिवारात रिमझिम सरी कोसळल्या तर आंबेवाडी शिवारात जोरदार पाऊस झाला.
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी, तडवळे परिसरात हलक्या सरी कोसळल्या तर खामगाव परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. ईट परिसरातही रात्री ढगाळ वातावरण होते तर तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात रात्री थांबून-थांबून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहेत. (प्रतिनिधी)
विद्युत धक्क्याने दोन म्हशी ठार
तुळजापूर : शहरातील वासुदेव गल्ली येथील गणेश कवडे यांच्या दोन म्हशी गुरूवारी सायंकाळी शेख फरिद दर्गाह परिसरात चरण्यासाठी नेण्यात आल्या होत्या़ सायंकाळीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसात म्हशी चरत असलेल्या परिसरातील विद्युत पोलच्या तारा तुटल्या़ तुटलेल्या तारांचा धक्का म्हशींना लागल्याने त्यांचा जोरदार शॉक बसल्याने मृत्यू झाला़ याबाबत कवडे यांनी दिलेल्या माहितीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेत १ लाख, दहा हजाराचे नुकसान झाल्याचे कवडे यांनी सांगितले़