वेतन उशिरा होण्याला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST2021-07-29T04:06:10+5:302021-07-29T04:06:10+5:30

--- औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा पगार प्रत्येक महिन्यात उशिरा होत आहे. सीएमपी प्रणाली सुरू झाली, तरीही पगार उशिरा ...

Who is responsible for late payment? | वेतन उशिरा होण्याला जबाबदार कोण ?

वेतन उशिरा होण्याला जबाबदार कोण ?

---

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा पगार प्रत्येक महिन्यात उशिरा होत आहे. सीएमपी प्रणाली सुरू झाली, तरीही पगार उशिरा होत असल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी होते आहे. शिक्षक संघटनांकडून शिक्षण विभाग आणि वित्त विभागाच्या टोलवाटोलवीकडे बोट दाखवले जात आहे, तर शिक्षण विभाग वेतन उपलब्धतेअभावी पगार करण्याला या महिन्यात उशीर झाल्याचे सांगत आहे.

प्राथमिक शिक्षक संघाचे राजेश हिवाळे म्हणाले, वेतन विलंबाने झाल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी होते. सीएमपी प्रणाली सुरू होऊन विहित मुदतीत प्रक्रिया राबविली जात नसल्याने विलंब होतो.

शिक्षक सेनेचे दीपक पवार म्हणाले, अकरा महिन्यांचे आणि आठ महिन्यांचे बजेट मागण्याचे काम शिक्षण विभागाचे आहे. सेवार्थचे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी असताना त्यांचे पगार जर पाच तारखेपर्यंत होतात, तर शालार्थचे काम का होत नाही?

---

जबाबदार कोण ?

---

वेतनासाठी आवश्यक चारमाही बजेट अनुदान अद्याप मिळालेले नाही. कोरोनामुळे वेतन अनुदानाला अडचणी निर्माण होत आहेत. २० टक्के वेतनाचे मे-जूनचा पगार अदा करता आला नाही, तर १०० टक्के वेतनाचे जून महिन्याचे वेतन अद्याप देता आले नाही. अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांच्या साडेआठ हजार शिक्षकांसाठी ७० कोटींच्या वेतन अनुदानाची मागणी केलेली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनुदान मिळाल्यावर तत्काळ वेतन अदा केले जाईल.

- बाळासाहेब पवार, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी, माध्यमिक विभाग, औरंगाबाद

---

जूनपर्यंत वेतन अदा झालेले आहे. दर महिन्याला २० टक्के, ४० टक्के आणि १०० टक्के अनुदानित, असे पाच हजार शिक्षकांच्या पगारासाठी सुमारे २० कोटी रुपये लागतात. शासनाने शिक्षण आयुक्त कार्यालयाला अद्याप वेतन अनुदान दिले नाही. एरव्ही अनुदान उपलब्ध असताना वेतनाला उशीर होत नाही.

- दिलीपकुमार जवळकर, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी, प्राथमिक विभाग, औरंगाबाद

---

शिक्षणाधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या २५ तारखेला बिल पाठविले पाहिजे. मात्र, त्यांना वेतन अनुदान शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून विलंबाने मिळत आहे. त्यामुळे त्यांची बिले उशिरा येत आहेत. बिले आली त्याचदिवशी कोषागारात पाठवली जातात. वित्त विभागात उशीर होत नाही.

- अप्पासाहेब चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि. प. औरंगाबाद.

----

जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनातील अडथळे दूर करण्यासाठी सीएपीम प्रणालीद्वारे वेतन गेल्या महिन्यापासून सुरू झाले. मात्र, या महिन्यात वेतन अनुदान उपलब्ध व्हायला उशीर झाल्याने वेतनाला उशीर झाला. नुकतेच अनुदान उपलब्ध झाल्याने आता अडचण येणार नाही.

- डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

Web Title: Who is responsible for late payment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.