कोट्यवधींचा निधी मार्गी कधी लागणार?
By Admin | Updated: November 6, 2016 00:34 IST2016-11-06T00:31:37+5:302016-11-06T00:34:59+5:30
जालना : जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांचे पंचवार्षिक टर्म संपायला काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे.

कोट्यवधींचा निधी मार्गी कधी लागणार?
जालना : जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांचे पंचवार्षिक टर्म संपायला काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. परंतु शासनाने गोरगरीब जनतेच्या विकासासाठी दिलेल्या कोट्यवधी रूपयांचा निधी अद्यापही खर्च करण्यात सत्ताधाऱ्यांचा हात अखडता असल्याचे दिसून येत असल्याने विकासाच्या कामावर निधी केव्हा खर्च होणार, असा संतप्त सवाल विरोधी सदस्यांनी उपस्थित केला.
अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सभेला सुरूवात झाली. स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी सदस्यांनी सुध्दा तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशी गत अखर्चित निधीवर चर्चेदरम्यान दिसून आली. विकासाच्या कामांबाबात सताधाऱ्यांसह विरोधी सदस्य म्हणावे तेवढे गंभीर नसल्याचे चित्र स्थायी समितीच्या बैठकीत दिसून आले.
सभेच्या प्रारंभीच उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी अखर्चित निधीच्या खर्चाविषयी सभागृह अनकुल आहे. पाणी पुरवठ्याची कामे दलितवस्ती आदी कामांवर निधी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले. तोच धागा पकडून विरोधी सदस्यांनी सत्ताधाऱ्यांचे पाच वर्षे संपत आली तरी अद्यापही २५ टक्के निधी खर्च झाला. उर्वरित ७५ टक्के निधी कधी खर्च करणार आणि कोणत्या कामावर खर्च करणार, अशी विचारणा केली. परंतु सत्ताधाऱ्यांना अद्यापही निधी कोठे खर्च करणार याचे नियोजन सभागृहासमोर ठेवले नाही. परिणामी जिल्हा परिषदेच्या उपकर आणि जिल्हा नियोजन समितीने विविध विभागाला दिलेले कोट्यवधी रूपये कसे खर्च करणार, असा प्रश्न पुढे आला आहे. विरोधी सदस्यांनी यावर गंभीर होण्याची गरज होती. परंतु तसे झाले नाही. सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनी अखर्चित निधीच्या विषयाला बगल देत चर्चा दुसऱ्याच विषयाकडे वळविल्याने अखर्चित निधीवर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही.