नुकसान भरपाई केंव्हा मिळणार ?
By Admin | Updated: July 2, 2014 00:31 IST2014-07-01T23:58:19+5:302014-07-02T00:31:07+5:30
कुंडलवाडी : मौजे पिंपळगाव (कु़) येथील २०१३-१४ च्या खरीप हंगामातील तोंडावर आलेले सोयाबीन, उडीद, मूग हे अतिवृष्टीत हातचे गेले़

नुकसान भरपाई केंव्हा मिळणार ?
कुंडलवाडी : मौजे पिंपळगाव (कु़) येथील २०१३-१४ च्या खरीप हंगामातील तोंडावर आलेले सोयाबीन, उडीद, मूग हे अतिवृष्टीत हातचे गेले़ तर फेब्रुवारी १४ मध्ये झालेल्या गारपीटीने कापणीला आलेले पिके जमीनदोस्त झाली़ या घटनेचा शिवार फेरी न करताच तलाठ्याने परस्पर यादी करून तहसीलदार बिलोली यांच्याकडे अहवाल पाठविला, असा आरोप आहे.
परिणामी गारपीटग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई शासनाकडून न मिळाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी सदर तलाठ्यास निलंबनाची मागणी करीत नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन बिलोली तहसीलदारांना दिले़
शासनाने माहे फेब्रुवारी व मार्च २०१४ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेती व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत असून नैसर्गिक आपत्ती गावनिहाय याद्या तयार करून, शासनपत्रात नमुद प्रमाणे लाभार्थ्यांची यादी प्रत्येक गावात चावडी, ग्रामपंचायत, कृषी सहाय्यक यांचे कार्यालयीन सूचना फलकावर ठळकपणे प्रसिद्ध करण्यात यावी, त्याचा प्रसिद्धी पंचनामा व अनुपालन तत्काळ कार्यालयास सादर करण्याचे आदेश देवूनही पिंपळगाव (कु़) चे तलाठी देवकांबळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेतपाहणी न करताच लाभार्थ्यांच्या याद्या परस्पर तयार करून पाठविल्याने खरा लाभार्थी हा गारपीट अनुदानापासून आजतागायत वंचित राहिला़ हा गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय असून कहर म्हणजे यादी नुकसानग्रस्तांची नावे समाविष्ट करण्यासाठी देवकांबळे यांनी पैशाची मागणी केल्याचेही निवेदनात नमूद केले आहे़
सदर प्रकरणाची येत्या २९ जून १४ पर्यंत चौकश्ी करून तलाठी देवकांबळे यांना निलंबित करावे व वंचित गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा येत्या ३० जून १४ रोजी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय बिलोली येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे़ निवेदनावर संभाजी धर्मपुरे, प्रताप भिंगे, सुधाकरराव कन्ने, जानिमियाँ इस्माईलसाब, मारोती हिवराळे, मारोती मदनुरे, गंगाधर मारोती, भिंगे यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत़ (वार्ताहर)