शेतकऱ्यांच्या समस्या ‘त्यांना’ काय कळणार?
By Admin | Updated: August 17, 2015 01:06 IST2015-08-17T00:31:35+5:302015-08-17T01:06:44+5:30
परळी / अंबाजोगाई : ज्यांना शेत काय असते? नांगर काय असतो? याची कसलीही माहिती नाही असे लोक केंद्र व राज्यात सत्तेत असल्याने त्यांना शेतकऱ्यांची दु:खे कशी कळणार?

शेतकऱ्यांच्या समस्या ‘त्यांना’ काय कळणार?
परळी / अंबाजोगाई : ज्यांना शेत काय असते? नांगर काय असतो? याची कसलीही माहिती नाही असे लोक केंद्र व राज्यात सत्तेत असल्याने त्यांना शेतकऱ्यांची दु:खे कशी कळणार? असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले. ठोस उपाययोजना न आखल्यास १४ सप्टेंबरपासून गावोगावी गुरांसह जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शुक्रवारी पवार परळी, अंबाजोगाईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते.
त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची सोय, शेतकऱ्यांचे कर्जमाफ, रोजगारांच्या हाताला काम शासनाने उपलब्ध न करुन दिल्यास १४ सप्टेंबर पासून जेलभरो आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन खा. शरद पवार यांनी केले. पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे रस्त्यावर सुद्धा शुकशुकाट दिसून आला. पाण्याची सोय नसल्याने पशुधन कसे जगवाव?े असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आर्थिक दृष्ट्या शेतकरी संकटात आला आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्याच्या रस्त्याने जावू नये सरकार जर बघ्याची भूमिका घेत असले तर त्यांना स्वस्थ बसू देणार नाही असे शरद पवार यांनी यावेळी सांगीतले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांनी गारपीटीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत केली आता दुष्काळातही ते शासनाकडून मदत मिळवून देतील अशी आशा विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
शनिवारी सकाळी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पवार अंबाजोगाईला गेले. तेथे त्यांनी प्रारंभी डॉ. विमल मुंदडा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सतीश चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, माजीमंत्री सुरेश धस, उषा दराडे, उमेश पाटील, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, संयोजक नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा उपस्थित होते.
माणसं जगवायची कशी? अशी भीषण स्थिती मराठवाडयात निर्माण झाली आहे. नव्वद टक्के जलस्त्रोत निकामी झाले. पेरा होऊनही पावसाअभावी हाती काहीच लागणार नाही. जनावरांना चारा नाही, पाणी नाही. मजुरांच्या हातांना काम नाही. यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशी स्थिती असतांनाही ठोस उपाययोजना न आखता पंतप्रधान कृषि खात्याचे नाव बदलून जनतेशी गंमती-जंमती खेळत आहेत. अशी टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली.
यावेळी डॉ. द्वारकादास लोहिया, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, डॉ. नरेंद्र काळे, सुदाम पाटील, प्रकाश राऊत, ज्ञानेश्वर चौरे यांच्यासह केज, नेकनूर व अंबाजोगाई तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या व्यथा पवारांसमोर मांडल्या. प्रास्ताविक अक्षय मुंदडा यांनी केले. यावेळी पवारांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. (वार्ताहर)
केज तालुक्यातील नायगाव येथील माजी सरपंच सर्जेराव खोडसे यांनी दुष्काळाची व्यथा मांडतांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी सर्व आमदार, खासदार, यांचे एक वर्षांचे संपूर्ण मानधन तर सर्व शिक्षकांचा एक महिन्याचा पगार एकत्रित करून या रक्कमेतून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली.
४या मागणीला प्रतिउत्तर देताना शरद पवार म्हणाले की, सरपंच, नको तिथे हात घालून विनाकारण भांडण ओढवून घेऊ नका, हे काम इतके सोपे नाही. कर्जमाफी आपण शासनाकडूनच करून घेऊ, असे सांगून त्यांनी खोडसे यांची समजूत काढली.