‘इको फ्रेंडली’ गावात होते मुलींच्या जन्माचे स्वागत
By Admin | Updated: July 21, 2014 00:35 IST2014-07-21T00:06:59+5:302014-07-21T00:35:17+5:30
हरी ठोंबरे , गाढेजळगाव घरात मुलगी जन्माला आली की नाक मुरडण्याची समाजाची प्रथा हळूहळू बदलत असली तरी आवश्यक जनजागृतीअभावी अजूनही स्त्री भ्रुणहत्या पूर्णपणे रोखणे शक्य झालेले नाही.

‘इको फ्रेंडली’ गावात होते मुलींच्या जन्माचे स्वागत
हरी ठोंबरे , गाढेजळगाव
घरात मुलगी जन्माला आली की नाक मुरडण्याची समाजाची प्रथा हळूहळू बदलत असली तरी आवश्यक जनजागृतीअभावी अजूनही स्त्री भ्रुणहत्या पूर्णपणे रोखणे शक्य झालेले नाही. परंतु औरंगाबाद तालुक्यातील कुंभेफळ गावात तर मुलगी जन्माला आली की तिचे जल्लोषात स्वागत होते. एवढेच नव्हे तर ती जन्माला येताच तिच्या लग्नाची तयारी, यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी या गावची ग्रामपंचायत पार पाडत आहे. अशा या गावची आदर्श वाटचाल आदर्शवत ठरली आहे.
औरंगाबाद-जालना रस्त्यावर शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या दक्षिणेला असलेल्या कुंभेफळ गावातील नागरिकांचा ५० टक्के व्यवसाय शेती असून अन्य पारंपरिक व्यवसायही चालू आहेत. पूर्वी गावची ओळख मर्यादित होती; पण शेंद्रा औद्योगिक वसाहतीमुळे गावाला आता नवीन ओळख लाभली आहे. ग्रामपंचायतीने पर्यावरण संतुलित समृद्ध गाव करण्यासाठी वृक्ष लागवड व जतन करण्याचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून दिले. तसेच प्लास्टिक बंदी, कर वसुली, गोबर गॅस, सौर ऊर्जा आदी कार्यक्रम यशस्वीपणे राबविले. लोकांनी स्वखर्चाने ३० सोलार हिटर बसविले आहे. तसेच शाळा, अंगणवाडी, दवाखाना, ग्रामपंचायत या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून २४ तास निगराणी ठेवली जाते.
कुंभेफळ येथील आदर्श ग्रामपंचायतीला ग्रामस्वच्छता अभियानाचे २०१२-१३ सालचे पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे, तसेच सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवरील ५० हजार रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले आहे.
पाटोद्याचे बक्षीस कुंभेफळला
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पाटोदा ग्रामपंचायतला सलग तीन वर्षे प्रथम पारितोषिक जाहीर झाले होते. मात्र, एकाच ग्रामपंचायतीला सलग तीन वर्षे हा पुरस्कार देता येत नाही, म्हणून २०१२-१३ मध्ये द्वितीय क्रमांकावर असलेल्या कुंभेफळ येथील ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले.
मुलगी झाली की तिच्या नावावर फिक्स डिपॉझिट
ग्रामपंचायतकडून स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. गावातील दाम्पत्याला पहिली मुलगी असल्यास आणि पुन्हा दुसरी मुलगी झाल्यास ग्रामपंचायत फंडातून वीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये अठरा वर्षांकरिता फिक्स करतात. ती मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिला एक लाख रुपये मिळणार. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना अंतर्गत तीन वर्षात दोन हजार नऊशे सत्तावन झाडांची लागवड केलेली आहे. ही झाडे सांभाळण्याची जबाबदारी स्वत: घरमालकास देण्यात आली आहे.
२४ तास मोफत रुग्णवाहिका
गावातील रुग्णांना अत्यावश्यक रुग्णसेवा देण्यासाठी २४ तास मोफत अॅब्युलन्सची व्यवस्था आहे, तसेच तरुणांसाठी व्यायामशाळा आदी उपक्रम ग्रामपंचायतीकडून राबविण्यात आले.
‘कुंभेफळला चला’ असे प्रत्येकाने म्हटले पाहिजे
महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ असे म्हटले होते, तर भविष्यात कुंभेफळला चला असे प्रत्येकाने म्हटले पाहिजे असे सर्व सुखसोयींनी स्वयंपूर्ण गाव बनविण्याचा निर्धार आम्ही केला. ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी आमच विशेष गौरव केला आहे.
-कांताबाई सुधीर मुळे (सरपंच)
स्वत:चे घर समजून काम केले
‘विविध योजना राबविताना गावपातळीवर खूप अडचणी आल्या तरी चालेल; परंतु हे गाव माझे मंदिर व स्वत:चे घर समजून काम केले, त्यामुळे अनेक अडचणींवर मात करण्यास शिकविले.’
-श्रीराम शेळके (उपसरपंच)
ग्रामपंचायतीला आर्थिक बळकटी
ग्रामविकास अधिकारी संगीता तायडे यांनी सांगितले की, या सर्व उपक्रमांसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समिती अध्यक्ष, सहसचिव, गावातील सर्वच नागरिक यासाठी पुढाकार घेतात. विशेष म्हणजे मी स्वत: घडाळ्याच्या काट्यावर (कार्यालयीन वेळ) काम न करता अहोरात्र झटत असते. सर्वांच्या मेहनतीमुळे कामाचे नियोजन होते. तसेच शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे आमच्या ग्रामपंचायतीला आर्थिक बळकटी मिळत आहे, असेही त्या म्हणाल्या.
गावात ग्रामपंचायतीकडून जलशुद्धीकरण प्रकल्प चालू आहे. यामुळे ते नागरिकांना पाच रुपयात वीस लिटरचा जार घरपोच पाठविण्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था केली आहे,