लग्नापूर्वी नवरदेवाने ठोकली धूम
By Admin | Updated: May 21, 2014 00:47 IST2014-05-21T00:30:06+5:302014-05-21T00:47:54+5:30
हदगांव:तालुक्यातील पिंपरखेड येथे १९ मे रोजी पाच सामूहिक लग्न होते़ त्यापैकी एका नवरदेवाने लग्नापूर्वीच पलायन केल्यामुळे नातेवाईकांची फजिती झाली़

लग्नापूर्वी नवरदेवाने ठोकली धूम
हदगांव:तालुक्यातील पिंपरखेड येथे १९ मे रोजी पाच सामूहिक लग्न होते़ त्यापैकी एका नवरदेवाने लग्नापूर्वीच पलायन केल्यामुळे नातेवाईकांची फजिती झाली़ माजी जि़ प़ सदस्य डिगांबर साखरे, तानाजी पाटील यांनी गावात धनगर समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता़ पाच लग्नही ठरले़ सहा महिन्यापूर्वीच समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे तानू वामनराव काळे (रा़ पिंपरखेड, ता़ हदगाव) व पांडुरंग वारकड (रा़ सारंगी, ता़ पूर्णा) यांचा विवाह ठरला़ लग्नाची तयारी झाली़ कपडेलत्ते खरेदी केले़ पत्रिकाही वाटप झाल्या़ सोयरे-धायरे जमा झाले़ नवरीला हळद लागली़ १८ मे रोजी नवरदेवाला आणण्यासाठी वधूच्या नातेवाईकांनी गाडी पाठविली़ परंतु नवरदेव दवाखान्यात असल्याचे सांगितले़ तिथे रात्रभर गाडी थांबली़ परंतु नवरदेव पसार झाला होता़ ही बातमी वार्यासारखी पसरली़ नवरीच्या घरची मंडळीही चिंताग्रस्त झाली़ मंगलमय वातावरणावर विरजणच पडले होते़ याच लग्नासाठी अर्धापूर येथून आलेले राम सरोदे व त्यांची पत्नी यांनी वधूच्या पित्याला भेटून आमच्याकडे एक मुलगा आहे, त्याला बघून घ्या असे सांगितले़ मुलीच्या वडिलांनी अर्धापूर येथे येवून मुलगा बघितला़ त्याला संपूर्ण कहाणी सांगितली़ रोहिदास खोब्राजी साखरे असे मुलाचे नाव असून तो विनाअट विवाहाला तयार झाला़ ठरल्याप्रमाणे त्याच मंडपात विवाह पार पडला़ एकीकडे सर्व रितीप्रमाणे सोयरिक होवून व तीन-चार तोळे सोनं, ३ लाख हुंडा देवूनही ऐनवेळी नवरदेव पसार झाला़ तर दुसरीकडे सामाजिक भान ठेवत कुटुंब कोलमडून पडले असता त्यांना आधार देवून समाजात एक आदर्श निर्माण करण्याचे काम या युवकाने केला आहे़ दरम्यान, याप्रकरणी पळून गेलेल्या नवरदेव पांडुरंग वारकड याच्याविरूद्ध पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती डिगांबर साखरे या नातेवाईकाने दिली़ (वार्ताहर)