पाणलोटचे पाट थांबले
By Admin | Updated: July 27, 2014 01:14 IST2014-07-27T00:10:07+5:302014-07-27T01:14:10+5:30
बाळासाहेब जाधव, लातूर जिल्हा कृृषी विभागाच्या वतीने वसुंधरा पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाभरात पाच टप्प्यातून पाणलोटची कामे करण्यात येत आहेत़
पाणलोटचे पाट थांबले
बाळासाहेब जाधव, लातूर
जिल्हा कृृषी विभागाच्या वतीने वसुंधरा पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाभरात पाच टप्प्यातून पाणलोटची कामे करण्यात येत आहेत़ यापैैकी पहिल्या दोन टप्यातील कामे कृषी विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहेत़ परंतु, उर्वरीत तीन टप्प्यातील कामे आजघडीला पूर्णपणे थंडावलेली दिसून येत आहेत़ पावसाळ्यापूर्वी या कामांना गती देऊन ती पूर्ण झाली असती तर पावसाळ्यात त्यांचा शेतकऱ्यांना लाभ होऊ शकला असता़
कृषी विभागाच्या वतीने वसुंधरा पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात २००९ पासून पाणलोटची कामे करण्यात येत आहेत़ शेती विकासाला चालना देण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत स्तरावरच पाणलोट समित्या स्थापन करुन त्याद्वारे ही कामे करवून घेण्यात येत आहेत़ या कामाअंतर्गत बांधदुरूस्ती, शेततळे, सिमेंट बंधारे अशी कामे निश्चित करण्यात आली़ त्यानुसार पहिल्या टप्यात २००९-१० साली रेणापूर- निलंगा, दुसऱ्या टप्यात २०१०-११ मध्ये लातूर-जळकोट- उदगीर- चाकूर, २०११-१२ रेणापूर-औसा, २०१२-१३ उदगीर-देवणी, २०१३-१४ मध्ये निलंगा- चाकुर अशा पाच टप्यात कामांची निश्चिती करण्यात आली़ या कामांसाठी ग्रामस्तरावरच १० सदस्यांची पाणलोट क्षेत्रविकास समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु आहे़
दरम्यान, आतापर्यंत २७० प्रस्ताव धर्मादायला सादर करण्यात आले़ त्यापैकी १९७ प्रस्तावांची परिपुर्ण नोंदणी करण्यात आली़ या समित्यांना मिळणाऱ्या १७८ कामांपैकी ४५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे़
दरम्यान, नोंदणी केलेल्या पाणलोट समितीच्या वतीने पाच टप्यातील कामे सुरू करण्यात आली़ यामध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्यातील पाणलोटक्षेत्राची कामे पूर्ण झाली आहेत़ परंतु, उर्वरीत तीन टप्प्यात नियोजित असलेली कामे थंडावली आहेत़
समितीच्या नोंदणीची अडचण़़़
कृषी विभागांच्या वसुंधरा पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमाअंतर्गत पाणलोटची कामे करण्यासाठी दहा सदस्यांची समिती ग्रामस्तरावर करण्यात येत आहे़ या समितीची नोंदणी धर्मादाय कार्यालयात करावी लागत असल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांत नोंदणीसाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे उत्सुकता दिसून येत नाही़ त्यामुळेही पाणलोटच्या कामात अडचणी येत आहेत़
- डॉ़टी़एस़ मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
२ कोटी रुपये गेले परत़़़
२००९ ते ११ पर्यंतच्या दोन टप्यात लातूर, चाकूर, जळकोट, उदगीर, रेणापूर, निलंगा या तालुक्यात ३७ पाणलोटची कामे पूर्र्ण झाली आहेत़ तर उर्वरीत तिसऱ्या टप्यातील ५, चौथ्या टप्यातील ३ व पाचव्या टप्यातील ५ अशा एकूण १३ ठिकाणची कामे रखडली आहेत़ त्यामुळे उर्वरीत कामेही तात्काळ व्हावीत अशी अपेक्षा भरत जाधव, गोविंद मुंडे, गोविंदराव पवार या शेतकऱ्यांनी व्यक्त केली़ आतापर्यंत जिल्ह्यासाठी १२ कोटी रुपयांचा निधी आला होता़ परंतु, त्यापैकी १० कोटी रुपयांचीच कामे झाली आहेत़ उर्वरीत निधी परत गेला आहे़
आतापर्यंत नोंदणी झालेल्या पाणलोट समित्यांकडून कामे करवून घेण्यात आली़ परंतु, धर्मादाय कार्यालयात नोंदणी करुन घेण्यास विलंब होत असल्याने नियोजित ठिकाणच्या समित्या स्थापन होऊ शकल्या नाहीत़ त्यामुळे पुढील टप्प्यातील कामे रखडली आहेत़