पाणी, कामांवर बैठकीत खल
By Admin | Updated: December 5, 2014 00:52 IST2014-12-05T00:34:02+5:302014-12-05T00:52:49+5:30
उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यात पर्जन्यमान ५० टक्केही झाले नाही़ त्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे़ अशा संकटाच्या वेळी काय उपाय योजना करता येतील,

पाणी, कामांवर बैठकीत खल
उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यात पर्जन्यमान ५० टक्केही झाले नाही़ त्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे़ अशा संकटाच्या वेळी काय उपाय योजना करता येतील, याअनुषंगाने गुरुवारी उदगीरात बैठक घेण्यात आली़ त्यात पिण्याचे पाणी अन् कामे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात खल झाला़
तोंडार पाटीजवळील साईधाममध्ये आमदार डॉ़सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही तालुक्यातील टंचाईचा आढावा घेण्यात आला़ व्यासपीठावर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, अतिरिक्त सीईओ मेघमाळे, उपविभागीय अधिकारी डॉ़विकास खरात, नागनाथ निडवदे यांची उपस्थिती होती़ प्रारंभी उदगीर तालुक्यातील टंचाईचा आढावा तहसीलदार गजानन शिंदे यांनी घेतला़ त्यानंतर जळकोटचे तहसीलदार कांबळे यांनी जळकोटचा आढावा मांडला़ प्रास्ताविक गटविकास अधिकारी डी़बी़ गिरी यांनी केले़ त्यावर आमदार भालेराव यांनी उपस्थित सरपंच, ग्रामस्थांना मुद्देसूद पद्धतीने आपापल्या गावातील नेमकी अडचण मांडण्याची सूचना केली़ त्याअनुषंगाने विविध गावांतून जमलेल्या नागरिकांनी आपापल्या गावांतील अडचणींची माहिती सादर केली़ त्यावर आवश्यक असणाऱ्या उपाय योजना करण्यासाठी प्रशासनास साकडे घातले़ सामान्यत: विहिरीतील गाळ काढणे, कामे उपलब्ध करुन देणे, बंद बोअर, हातपंपाची माहिती घेऊन ते दुरुस्त करणे, जनावरांना मोफत चारा उपलब्ध करुन देणे अशा सूचना नागरिकांनी मांडल्या़ भालेराव यांनी लिंबोटी धरणातून कायमस्वरुपी योजनेचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना केली़ यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रशासन टंचाईचा सामना करण्यास तत्पर असल्याचे सांगितले़ या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनावश्यक सुट्या टाळण्याची सूचना करुन आवश्यक असेलच तर उपविभागीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती देणे बंधनकारक केल्याचे सांगितले़ सीईओ दिनकर जगदाळे यांनीही कोणत्याही परिस्थितीत टंचाई सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगितले़ यावेळी जि़प़ सदस्य चंदन पाटील व गटनेते रामचंद्र तिरुके यांनीही सूचना मांडल्या़ अध्यक्षीय समारोपात आमदार भालेराव यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले़ (वार्ताहर)४
आमदार सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखालील टंचाई आढावा बैैठकीस उदगीर, जळकोट तालुक्यातील बहुतांश काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली़ बैैठकीची जागा ही आडवळणाची असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे काँग्रेस लोकप्रतिनिधींनी यावेळी केली़
भाषणांना चढला जोऱ़़
४दोन तास उशिरा सुरु झालेल्या बैैठकीत लोकप्रतिनिधींकडून मुद्देसूद मांडणीऐवजी भाषणबाजीच होऊ लागली़ नेमकी कोणत्या गावी, काय अडचण आहे, याची मांडणी करण्यास सांगितल्यानंतरही मोघम मागण्या मांडून त्यावरच्या उपायांचा सल्ला देण्यात आला़ एकाही सदस्याने आपल्या मतदारसंघातील नेमक्या कोणत्या गावी काय उपाययोजना करायची, याचा साधा उल्लेखही केला नाही़
पंधरा दिवसांत ग्रामदिन संकल्पना़़़
४सरकारी कर्मचारी गावात दिसत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामदिन ही संकल्पना राबवीत असल्याचे सांगितले़ त्यानुसार ग्रामस्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व अन्य कर्मचारी ठराविक वारी पूर्णवेळ त्या-त्या गावांमध्ये हजर राहतील़ पंधरा दिवसांत हे काम सुरु करण्याचे संकेत दिले़