आठवड्यापासून पाण्याची बोंबाबोंब
By Admin | Updated: December 26, 2014 00:15 IST2014-12-26T00:09:15+5:302014-12-26T00:15:43+5:30
औरंगाबाद : शहरात आठवड्यापासून पाण्याची बोंबाबोंब सुरू असून, ख्रिसमसचा सणही नागरिकांना पाण्याविना साजरा करण्याची वेळ आली.

आठवड्यापासून पाण्याची बोंबाबोंब
औरंगाबाद : शहरात आठवड्यापासून पाण्याची बोंबाबोंब सुरू असून, ख्रिसमसचा सणही नागरिकांना पाण्याविना साजरा करण्याची वेळ आली. शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा कंपनीने केला आहे.
गुरुवारी जायकवाडीतील दोन आणि फारोळ्यातील एक जलउपसा पंप बंद होता. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील पंप सायंकाळी ६ वाजेनंतर सुरू झाला, तर जायकवाडीतील पंप उशिरा सुरू झाले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जायकवाडीतील पंप बंद होते, तर फारोळ्यातील पंप तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला होता. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. गेल्या शुक्रवारपासून सिडको-हडकोमध्ये पाणीपुरवठा झालेला नाही. तर उर्वरित शहरात मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीय. त्यातच नाताळचा सण असल्यामुळे छावणी, शांतीपुरा वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. खाजगी टँकर्सकडून नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागले. चार तास पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते.
महापौरांनी केली पाहणी
महापौर कला ओझा यांनी समर्थनगर भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरून पाहणी केली. यावेळी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीचे अभियंते, कर्मचाऱ्यांसह मनपा अभियंता हेमंत कोल्हे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर आ.अतुल सावे, नगरसेवक प्रशांत देसरडा यांनीही एन-५ येथील जलकुंभ पाणीपातळीचा आढावा घेतला. सिडको-हडको पाण्याची बोंब होत असल्याकारणाने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जलकुंभावरील कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.
पवननगरमध्ये आज एक टप्पा देण्यात आला. दुसरा टप्पा रात्री उशिरा देण्यात येणार होता. मात्र, पाणीपुरवठाच झाला नाही,असे नितीन चित्ते यांनी सांगितले.
वीजपुरवठा खंडित...
जायकवाडी पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दोन पंप बंद पडले. तर फारोळ्याचा पंप बंदच होता, तो सायंकाळी उशिरा सुरू झाला. त्यामुळे अनेक भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. एकापाठोपाठ एक पंप बंद पडण्याची मालिका सुरू असल्यामुळे जलवाहिन्यांतून पाणी येण्यास उशीर होत गेला. परिणामी शहरात अनेक भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.
दूषित पाण्याच्या ७०० तक्रारी
दूषित पाणीपुरवठ्याच्या ७०० तक्रारी कंपनीकडे करण्यात आल्या आहेत. १ सप्टेंबरपासून आजपर्यंतच्या तक्रारी असून, त्यातील ६३९ तक्रारींचा निपटारा केल्याचा दावा कंपनीने केला आहे.
आज रेल्वेस्टेशन व इतर भागातील जलवाहिन्यांची दुरुस्ती केली. तसेच समर्थनगर, सिद्धार्थनगर भागातील दूषित पाणीपुरवठ्यावर उपाय म्हणून जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे कंपनीने कळविले आहे.
सुरेवाडीत ठणठणाट
सुरेवाडी परिसरात पाणीपुरवठा न झाल्यामुळे आज नागरिकांनी एन-५ येथील जलकुंभावर गर्दी केली होती. कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा केव्हा होणार याची माहिती विचारली; मात्र कुणीही त्यांना उत्तर दिले नाही.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गळती
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतील अनेक अधिकारी, कर्मचारी काम सोडून जात असल्याचे वृत्त आहे. ग्राहक सेवा अधिकाऱ्यांनी मागील महिन्यातच काम सोडले आहे. कंपनीत नवीन अधिकारी नेमले जात आहेत. परंतु त्याचा परिणाम पाणीपुरवठा यंत्रणेवर होतो आहे. जुने कर्मचारी सोडून जात असल्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना यंत्रणेची माहिती घेताना दमछाक होते आहे. सध्या कंपनीकडे मनपाचे ३९३ कर्मचारी आहेत. २०० कर्मचारी कंत्राटी म्हणून घेतले आहेत. ३८ कंपनीचे अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांपैकी काही जणांनी राजीनामे दिले आहेत. परंतु त्यांचे राजीनामे अद्याप मंजूर झालेले नाहीत. परंतु ते अधिकारी कामावर येत नाहीत. कंपनीने आॅपरेशन, मेन्टेनन्स, सर्व्हिस, एचआर, सिव्हिल, सप्लाय, अशा वेगवेगळ्या आस्थापनेखाली अधिकारी, कर्मचारी नेमले आहेत. व्यवसाय प्रमुख गौरीशंकर बासू यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा होती; मात्र त्यांचा राजीनामा कंपनीने घेतला नाही.
१ सप्टेंबरपासून कंपनीने पाणीपुरवठा देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. चार महिन्यांतच कंपनीला वैतागून कर्मचारी पळ काढीत असल्यामुळे आगामी काळात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होणार की नाही, असा प्रश्न आहे.
कंपनीच्या मते कॉर्पाेरेट संस्थेमध्ये कर्मचारी येतात, जातात. त्याचा संस्थेच्या सेवा क्षेत्रावर कुठलाही परिणाम होत नाही. काही जणांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, अजून कुणीही काम सोडून गेलेले नाही.