जलवाहिनीची दुरुस्ती रखडली
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:12+5:302016-04-03T03:50:17+5:30
जालना : जायकवाडी-जालना जलवाहिनी गुरूवारी सकाळी पैठणजवळ फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. कंत्राटदार आणि पालिकेतील देयकच्या वादावरून दुरुस्ती रखडली आहे.

जलवाहिनीची दुरुस्ती रखडली
जालना : जायकवाडी-जालना जलवाहिनी गुरूवारी सकाळी पैठणजवळ फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. कंत्राटदार आणि पालिकेतील देयकच्या वादावरून दुरुस्ती रखडली आहे. परिणामी जालना शहरात जयकवाडी धरणातून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे.
जलवाहिनी दुरूस्ती व देखभाल करणाऱ्या एजन्सीचे पालिकेकडे अडीच कोटी रुपये थकित आहेत. जलवाहिनी फुटून तिची दुरूस्ती युद्ध पातळीवर होणे गरजेचे असताना प्रत्यक्षात संबंधित एजन्सीने दुरूस्ती न करण्याचा पवित्रा घेतल्याने पाणीपुरवठा बंद आहे. जोपर्यंत दुरूस्ती होत नाही तोपर्यंत शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. काही भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
जालना ते जायकवाडी या बहुचर्चित जलवाहिनीतून तीन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा सुरू झाला. पालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने सुरूवातीला तीन महिन्यांसाठी महाराष्ट्र एजन्सीकडे दुरूस्ती व देखभालीचे काम दिले होते.
त्यानंतर हा करार वाढविण्यात आला. संबंधित एजन्सीला पालिकेकडून नियमित देयके अदा करण्यात आली नाहीत. आज रोजी पालिकेकडे तब्बल अडीच कोटी रूपये थकले आहेत. मोठी रक्कम थकल्याने काही दिवसांपासून दुरूस्तीचे काम थांबविले आहे. संबंधित एजन्सीचे तंत्रज्ञ मिळून दहा कर्मचारी आहेत. यात इलेक्ट्रीशिअन, फिटर, वेल्डर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे कर्मचारीच पाणी सोडणे, पंप तसेच इतर दुरूस्तीचे काम करतात.
पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे म्हणाले, संबंधित एजन्सीने काम थांबविले आहे. माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी अंबड पालिकेकडे थकलेल्या ९० लाख रूपयांच्या रकमेबाबत जिल्हाधिकारी ए. एस. आर. रंगानायक यांच्याशी चर्चा केली आहे. चौदाव्या वित्त आयोगातून ही रक्कम वळती करावी, अशी मागणीही केली आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, अंबड पालिकेने शनिवारी दुपारी ५० लाख रुपये जमा केले आहेत. दुरुस्ती तसेच पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे संबंधित एजन्सीसोबत चर्चा करीत आहेत. लवकरच याबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल.