कंधारला ‘लिंबोटी’तून पाणी
By Admin | Updated: August 10, 2014 02:23 IST2014-08-10T01:50:22+5:302014-08-10T02:23:13+5:30
कंधार : शहाराचा पाणी प्रश्न पाणी स्त्रोताअभावी ऐरणीवर आला होता. राज्यशासनाच्या सुजल व निर्मल अभियानांतर्गत पा.पु. योजनेला २५ कोटी ६७ लाखाची

कंधारला ‘लिंबोटी’तून पाणी
कंधार : शहाराचा पाणी प्रश्न पाणी स्त्रोताअभावी ऐरणीवर आला होता. राज्यशासनाच्या सुजल व निर्मल अभियानांतर्गत पा.पु. योजनेला २५ कोटी ६७ लाखाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली. ८ आॅगस्ट रोजी न.प. विशेष सभेत सर्वानुमते कामाची निविदा मंजुरीचा ठराव पारीत करण्यात आला. लिंबोटी धरणातून पाणी आणून शहराची कायमची पाणी टंचाई दूर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
शहराची तहान मानार नदी व जगतुंग समुद्रातील पाणी स्त्रोतावर अवलंबून आहे. पर्जन्यमानाचा सततचा लहरीपणा, मानार नदी व जगतुंग समुद्रातील घटत असलेला जलस्त्रोत आदीमुळे शहरावर सतत पाणी टंचाईचे ढग असतात. यासाठी न.प.ने महाराष्ट्र शासनाच्या सुजल व निर्मल अभियानांतर्गत पा.पु. योजनेचा सुमारे ३६ कोटीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. प्रस्तावात दरडोई १३५ लिटरचा समावेश होता. परंतु शासनाने प्रतिदिन प्रति मनुष्य ७० लिटर प्रमाणे २५ कोटी ६७ लाखाची पा.पु. योजनेला मार्च २०१४ ला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली. तरीही निविदा मान्य करणे, पाणी पुरवठा करुन पाणी प्रश्न निकाली काढताना मात्र न.प. मधील गटा-तटाचे राजकारण अडसर ठरते की काय? अशी भिती नागरिकातून व्यक्त केली जात होती.
८ आॅगस्ट रोजी विशेष सभा नगराध्यक्षा शोभाताई नळगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्वानुमते निविदा मान्य करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व तिर १४ अशा १६ जणांनी यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. लिंबोटी धरणाच्या (अप्पर मानार प्रकल्प) बुडीत क्षेत्रातून अशुद्ध पाणी उपसा करुन २५ कि.मी.च्या उद्धरण नलिकेद्वारे शहरात आणण्याचे प्रकल्पीत आहे. लिंबोटी धरणाच्या बुडीत क्षेत्रात जौकवेल हाऊस आणि उद्धरण नलिका, पंपींग मशिनरी, भिमगड येथे उंच जलकुंभ, नवीन वाढ वस्तीत वितरण व्यवस्था अंथरणे आदी कामाचा त्यात समावेश आहे.
योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराचा आगामी ५० वर्षाचा पिण्याचा पाणी प्रश्न योजनेमुळे दूर होणार असून १२ महिने मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होईल, असे नगराध्यक्षा शोभाताई नळगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सतत भेडसावणारी पाणी टंचाई आता या योजनेमुळे दूर होणार आहे. शोभाताई नळगे यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठे व नागरिकांना कायमचा दिलासा देणारे काम असल्याची भावना नागरिकतून व्यक्त होत आहे. योजनेचे काम कमी काळात व जलद गतीने पूर्ण होण्याची प्रतिक्षा नागरिकातून होत आहे. (वार्ताहर)