जलसंवर्धनाची गायिली जाते रोज येथे महती..!
By Admin | Updated: May 21, 2016 23:59 IST2016-05-21T23:42:45+5:302016-05-21T23:59:03+5:30
जालना : जालना शहराला महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये प्रकाश झोतात आणणाऱ्या व डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे दिवास्वप्न असणाऱ्या महिको रिसर्च

जलसंवर्धनाची गायिली जाते रोज येथे महती..!
जालना : जालना शहराला महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये प्रकाश झोतात आणणाऱ्या व डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे दिवास्वप्न असणाऱ्या महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टने दुष्काळी परिस्थितीवर पाण्याच्या अभूतपूर्व नियोजनाने मात करीत जिल्ह्यातील जलक्रांतीचा शंख फुंकला आहे. लोकमत जलमित्र अभियानासही ‘महिको’ ने सक्रिय पाठिंबा देत जिल्ह्यातील इतर कंपन्यांसमोर एक आदर्श निर्माण ठेवला आहे.
महाराष्ट्राला विशेषत: मराठवाड्याला अवर्षणाने जवळपास मागील १० वर्षांपासून ग्रासलेले आहे. यावर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. परंतु राज्यात अशा काही संस्था, व्यक्ती आहेत की ज्यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरु केले आहेत. अशाच संस्थांपैकी एक संस्था म्हणजे ‘महिको’. महाराष्ट्रात पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा त्रास महिकोलाही होऊ लागला. त्यातच अवर्षण आणि बेभरवश्याच्या मान्सूनमुळे परिस्थिती अधिकच भीषण झाली. मुळातच बियाणे कंपनी असल्यामुळे पाण्याची प्रचंड गरज भासत होती. कंपनीमध्ये ग्रीन हाऊसेस, रिसर्च आणि इतर कामांसाठी दररोज २ लाख लिटर पाणी वापरले जाते. उन्हाळ्यात एवढे पाणी विकत घेणे म्हणजे खर्चिक बाब आणि त्यातही दुष्काळात एवढे पाणी म्हणजे वापरावरच प्रश्नचिन्ह? यावर तोडगा काढण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाने २००८ मध्ये रेन वॉटर हार्वेस्टींगची संकल्पना मांडली. नेहमीप्रमाणे असणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टींगच्या या संकल्पनेत थोडासा बदल केला गेला. जवळपास १०० एकरात असलेल्या कंपनीच्या विविध प्लांटमध्ये रुफ वॉटर हार्वेस्टींग करण्यात आले. त्यातून जमा होणारे पाणी १० फूट उंचीच्या अन् चार फुट रुंदीच्या नाल्यामध्ये सोडले गेले. या नाल्यांद्वारे जमा झालेले पावसाचे पाणी कंपनीच्या परिसरात बनविण्यात आलेल्या १५० बाय २०० फूट आणि २० फूट खोल असलेल्या तळ्यामध्ये पंपींग करण्यात येते. अशा आकाराची दोन तळी कंपनीकडे असून, तळ्यातील पाणी जमिनीत मुरु नये म्हणून ८० मायक्रॉनचे प्लास्टीक शीट तळ्यात अंथरल्या आहेत. तसेच बाष्पीभवन रोखणारे एक स्पेशल जेलही पाण्यात टाकण्यात येते. या तळ्यामध्ये प्रत्येकी १.२५ कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. म्हणजे कंपनी पावसाचे पाणी साठवून जवळपास २.५ कोटी लिटर पाणी साठविते. कंपनीमध्ये तिसऱ्या तळ्याचीही निर्मिती सुरु असून, तो पूर्ण झाल्यावर कंपनी पावसाचे जवळपास ३.५ कोटी लिटर पाणी वाचवेल.
याशिवाय कंपनीने अंतर्गत विहिरीजवळ एक मोठा खड्डा करुन त्यात पावसाचे पाणी मुरविण्याची व्यवस्था केली आहे. तसेच कंपनीच्या आवारात राहणाऱ्या ५० कुटुंबाच्या सांडपाण्यावर आणि कंपनीतील वापरलेल्या पाण्यावर कंपनीतील ट्रीटमेंट प्लांटमध्ये प्रक्रिया करुन दररोज जवळपास ७० हजार लिटर पाणी पुनर्वापरायोग्य करण्यात
येते.
तसेच तळ्यातील पाण्यावरही आर. ओ. प्लांटमध्ये प्रक्रिया करुन हे पाणी कर्मचारी तसेच परिसरातील कुटुंबास पिण्याकरीता ५० हजार लिटर पाणी रोज उपलब्ध करुन दिले जाते.
कंपनीमध्ये केल्या गेलेल्या या जलसंवर्धन कामांमुळे कंपनी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहे. जलसंवर्धनाची कामे करण्यापूर्वी कंपनीला जानेवारीपासूनच टॅँकर्सची गरज भासायची. परंतु आता एप्रिलपर्यंत टॅँकर्सकडे पाहावेही लागत नाही. सोबतच कंपनीमध्ये वीज बचतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक स्वीचवर स्वीच बंद करण्याची आग्रहाची विनंती चिकटल्याने कर्मचारीही उत्स्फूर्तपणे विजेची बचत करतात.
एवढेच नव्हे तर महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या श्री गणपती नेत्रालयातही महिको ग्रुपतर्फे जलसंवर्धन करण्यात येते. रुग्णालयात बसविण्यात आलेल्या ‘सेव्हेज ट्रीटमेंट प्लांट’ द्वारे रुग्णालयातील सांडपाणी, शौचालयातील पाणी आणि इतर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी पुनर्वापरायोग्य बनविले जाते. रोजच्या वापरल्या जाणाऱ्या ३५ हजार लिटर पाण्यापैकी १० ते १५ हजार लिटर पाण्याचा पूनर्वापर याठिकाणी केला जातो. श्री गणपती नेत्रालयाच्या या प्रकल्पास राज्य प्रदूषण नियामक मंडळाचे प्रमाणपत्र प्राप्त आहे. या प्लांटमुळे रुग्णालयास भरपूर फायदा झाला असून, आजघडीला आठवड्यास दोनच टॅँकर्स मागविले जातात.