आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनसाठी लातुरात वाव
By Admin | Updated: June 16, 2015 00:49 IST2015-06-16T00:39:33+5:302015-06-16T00:49:47+5:30
पंकज जैस्वाल / महेश पाळणे , लातूर लातूर शहरात एक-दोन नव्हे तर बॅडमिंटनचे तब्बल १९ कोर्ट आहेत़ त्यातच लातूर जिल्हा बॅडमिंटन संघटनाही खेळाडू घडवीत आहे़ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू चमकण्यासाठी

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनसाठी लातुरात वाव
पंकज जैस्वाल / महेश पाळणे , लातूर
लातूर शहरात एक-दोन नव्हे तर बॅडमिंटनचे तब्बल १९ कोर्ट आहेत़ त्यातच लातूर जिल्हा बॅडमिंटन संघटनाही खेळाडू घडवीत आहे़ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू चमकण्यासाठी लातुरातही वाव आहे़ आज मितीला बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील चॅलेंज स्पर्धा लातूरच्या १९ कोर्टवर घेतल्या जावू शकतात, असे मत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तथा आॅलम्पियन निखील कानेटकर यांनी व्यक्त केले़
लातूर जिल्हा बॅडमिंटन असोशिएशनच्या वतीने लातुरातील शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी आले असता, ‘लोकमत’शी त्यांनी खास बातचित केली़ येणाऱ्या काळात क्रिकेटपेक्षाही चांगले दिवस बॅडमिंटनला येणार आहेत़ बॅडमिंटनसाठी लातूरला पोषक वातावरण आहे़ परंतु खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे़ गेल्या पाच वर्षांपासून पुणे येथील शिबिरात लातूरच्या खेळाडूंचा हिरीरीने सहभाग असल्याचे सांगत लातूरच्या खेळाडूतही गुणवत्ता ठासून भरली आहे़ बॅडमिंटनसाठी येथे वातावरण तर आहेच मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकायचे असल्यास बॅडमिंटनचे अचुक कौशल्य हस्तगत करणे गरजेचे आहे़ येथील जिल्हा संघटनाही बॅडमिंटन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहे़ यासह खेळाडूंंच्या कौशल्यवाढीसाठी अधिक भर देणे गरजेचे असल्याचे सांगत कानेटकर म्हणाले, आदित्य माळी, अशिष बंग यांच्यासह अनेक खेळाडू लातूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवू शकतात. लातुरातील दयानंद महाविद्यालय, क्रीडा संकुल येथे प्रत्येकी चार कोर्ट आहेत़ एसएमआर स्वीमिंग पूल येथे तीन कोर्ट आहेत़ तहसीलमागील बचत भवन, बांधकाम भवन, बनसोडे हॉल, बाभळगाव पोलिस मुख्यालय येथे प्रत्येकी एक बॅडमिंटन कोर्ट आहे़ लातुरातील हे कोर्ट उच्च प्रतिचे असल्याचे कानेटकर यांनी सांगितले़
मूळचे पुण्याचे निखिल कानेटकर यांनी २००४ मध्ये अथेन्स आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले़ तसेच मलेशिया, बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधीत्त्व केले़ मलेशिया व जपान येथे झालेल्या थॉमस कप स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरी गाठली होती़ दोहा येथे झालेल्या एशियन स्पर्धेत व अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेतही त्यांचा सहभाग होता़
बॅडमिंटन खेळात शारीरिक हालचाली, अचुक नजर आणि योग्य समन्वयाला महत्व आहे़ या तिन्ही गोष्टीवर खेळाडूंनी अधिक भर देणे गरजेचे आहे़ यातूनच त्यांच्या खेळाचा विकास होईल, यासह शारीरीक तंदुरुस्ती वाढविण्यासाठी वेट ट्रेनिंग, मॅराथॉन, सर्किट ट्रेनिंग यांचा लाभ होऊ शकतो़ यासोबतच योग्य आहार व विहारही गरजेचे आहे़ खेळातील दैनंदिन सातत्यही कौशल्यवाढीस लाभदायक ठरते, असे निखिल कानेटकर यांनी सांगितले़