जिल्ह्यात ४०० च्या वर रोहित्र दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: October 31, 2014 00:34 IST2014-10-31T00:15:41+5:302014-10-31T00:34:01+5:30
गंगाराम आढाव, जालना जिल्ह्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले. शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत रोहित्र देणे बंधनकारक असतांनाही

जिल्ह्यात ४०० च्या वर रोहित्र दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
गंगाराम आढाव, जालना
जिल्ह्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले. शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत रोहित्र देणे बंधनकारक असतांनाही महिनोनमहिने त्यांना रोहित्र मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्हाभरात महावितरण कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार २४३ रोहित्र जळालेली असल्याचे अधिकारी सांगतात. दरम्यान प्रत्यक्षात त्यापेक्षा दुप्पट रोहित्र जळालेली असल्याचे समोर आले असून ही रोहित्रे दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
जालना जिल्ह्यात महावितरण कंपनी कडून जळालेल्या रोहित्रा बाबत दोन विभाग करण्यात आले आहे. या दोन्ही विभागाकडे चार चार तालुके वाटुन देण्यात आले. जळालेली रोहित्र दुरूस्तीसाठी पाठविणे व ते शेतकऱ्यांना देने अशी जबाबदारी या विभागाकडे आहेत. ग्रामीण विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्याचा समावेश आहे. या चारही तालुक्यात ६३ के. व्ही चे ११६ व १०० केव्हीचे ४३ असे १५९ रोहित्र जळालेले असल्याचे युनिट अभियंता काळे यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाभरात ४०० रोहित्रे जळालेली आहेत.
विभाग क्रमांक २ मध्ये परतू, मंठा, अंबड व घनसावंगी या तालुक्याचा समावेश आहे. या चार तालुक्यात एकुण ७० रोहित्र जळालेली असल्याचे युनिट अभियंता चाकोर यांनी सांगितले. या पैकी कोणत्या तालुक्यात किती रोहित्र जळालेली आहेत. याची माहिती विचारली असता आपल्याकडे एवढीच माहिती आहे. ती संबंधीत अभियंत्यांना विचारा असे उत्तर दिले. दरम्यान युनीट दोन मधील चार तालुक्यांपैकी फक्त अंबड तालुक्यातच ६० रोहित्रे जळालेली असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे युनिटच्या अभियंत्यांनाच आपल्या युनिटमधील किती रोहित्रे जळालेली आहे. याची नेमकी माहितीच नसल्याचे समोर आले आहे.
जिल्हाभरात दोन्ही युनिटचे मिळून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २४३ रोहित्र जळाले आहे. यातील १४३ रोहित्रे हे या महिनाभरात जळालेली आहे. तर शंभर रोहित्र मागील दोन तीन महिन्यापासून जळालेली आहे. हे सर्व रोहित्र दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
महिनो, महिने प्रतीक्षा
सर्व खर्च करून व कागदपत्राची पूर्तता करूनही महिनोनमहिनो शेतकऱ्यांना रोहित्र मिळत नाही. त्यासाठी वारंवार महावितरण कार्यालयात खेटे मारावे लागत आहे.
जिल्ह्यातील जळालेल्या या अडीचशे रोहित्रावरील सुमारे सात हजार शेतकऱ्यांचे कृषि पंप विजे अभावी बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्या अभावी पिके वाया गेली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना फक्त ३० ते ४० टक्केच खरीपाचे उत्पादन झाले. त्यातच मालाला हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च ही निघला नाही. आता रब्बीसाठी शेतकरी पदरमोड करून रोहित्रासाठी आटापिटा करत आहे.
नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुका दरम्यान गावात पुढाऱ्यांनी विजे संबधी आश्वासने दिले. आज जिल्हा भरातील अडीशे रोहित्र नादुरूस्त आहेत. विजे अभावी शेतकरी मेटाकुटीस आलेले आहे. असे असतानाही राजकीय पुढाऱ्यांना शेतकऱ्यांच्या या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यांची अनास्था दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणताही पक्ष संघटना शेतकऱ्यांच्या मागे नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहेत. त्यामुळेच महावितरण कडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचे शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहे.
जिल्ह्यातील रोहित्र दुरूस्तीसाठी पाच वेगवेगळ्या कंपन्याकडे पाठविले जातात. तत्पूर्वी ज्या गावातील रोहित्र जळाले त्या गावातील ग्रामस्थांना सुमारे ३० टक्के लोकवर्णी भरने, विज बिल भरून कागदपत्रांची पुर्तताकरून प्रस्ताव दाखल करावा करावा लागत आहे. तसेच स्वखर्चाने ते रोहित्र दुरूस्तीसाठी महावितरण कार्यालयात जमाकरावे लागत आहे. त्यानंतर ही दुरूस्त झालेले रोहित्र स्वखर्चानेच गावात नेवा लागत आहे. या सर्व प्रक्रियेत शेतकरी भराडला जात आहे. जळालेली रोहित्रांच्या वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना उचलावा लागत आहे.