वाळूचे तीन टिप्पर ग्रामस्थांनी पकडले
By Admin | Updated: April 1, 2015 00:56 IST2015-04-01T00:45:10+5:302015-04-01T00:56:19+5:30
परतूर : परतूर तालुक्यातील गोळेगाव वाळू पट्टयातून अहोरात्र वाळूउपसा सुरू असून, रात्री जाणारे तीन टिप्पर गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

वाळूचे तीन टिप्पर ग्रामस्थांनी पकडले
परतूर : परतूर तालुक्यातील गोळेगाव वाळू पट्टयातून अहोरात्र वाळूउपसा सुरू असून, रात्री जाणारे तीन टिप्पर गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या वाळू उपशासाठी पोकलॅनचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले.
परतूर तालुक्यात दुधना व गोदावरी वाळू पट्टयातून सतत अवैध वाळू उपसा सुरू आहे. यातच आता गोदावरीच्या पात्रातील गोळेगाव वाळू पट्टयाचा काही दिवसांपूर्वी लिलाव झाला आहे. त्यामुळे कितीही वाळू उपसा व कशीही वाहतुक करा, नियंत्रण कोणाचेच नसल्याने या पात्रातून अहोरात्र वाळू उपसा सुरू आहे. या ठिकाणाहून परतूर, माजलगाव, बीड, जालना, औरंगाबाद आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात टिप्परने वाहतुक वाळू केली जात आहे. या पात्रात वाळू उपशासाठी पोकलँडचा वापर करण्यात येत आहे. या पात्रातून रात्री जालना औंरगाबादकडे जाणारे तीन टिप्पर वाटूर येथे गावकऱ्यांनी पकडून परतूर पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळी बराच गोंधळ झाला. आता परतूर पोलिसांनी तहसीलदार यांना लेखी पत्र देऊन या टिप्परवर कारवाई करण्यासंबधी कळवले आहे.
तहसील कार्यालयाने या टिप्पर मालकांना प्रत्येकी १० हजार असे एकुण ३० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अहोरात्र उपशामुळे आष्टीकर वैतागले असून वाहनांची वर्दळ व सतत हार्नचा आवाज यामुळे परिसरातील लोक त्रस्त झाले आहे. तरी, या उपशावर निर्बंध घालावे अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)