ब्रह्मवृंदांच्या एकजुटीचे दर्शन
By Admin | Updated: May 9, 2016 00:05 IST2016-05-09T00:03:58+5:302016-05-09T00:05:15+5:30
औरंगाबाद : दोन शंकराचार्यांच्या उपस्थितीत चार वेदांचा मंत्रोच्चार, शंखनादाने निर्माण झालेल्या मंगलमय वातावरणात रविवारी सायंकाळी भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.

ब्रह्मवृंदांच्या एकजुटीचे दर्शन
औरंगाबाद : दोन शंकराचार्यांच्या उपस्थितीत चार वेदांचा मंत्रोच्चार, शंखनादाने निर्माण झालेल्या मंगलमय वातावरणात रविवारी सायंकाळी भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी समाजातील २५ संघटना पहिल्यांदाच एकत्र आल्या. ‘जय परशुराम’ असा जयघोष करीत ब्रह्मवृंदांनी एकजुटीचे दर्शन घडविले. धार्मिक श्रद्धा, देशभक्ती, शक्ती, संस्कृती, कलेचा अनोखा संगम यानिमित्ताने सर्वांना पाहण्यास मिळाला.
भगवान परशुराम जयंतीत शोभायात्रेने ब्रह्मवृंदांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात सायंकाळी पैठण येथील एकनाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली. वेदाचार्य सी. एम. पिंपळे महाराज, अशोक देव, दुर्गादास मुळे यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेदांचा मंत्रोच्चार करीत संपूर्ण वातावरण मंगलमय केले. शंखध्वनी घुमला आणि शोभायात्रेला सुरुवात झाली. अग्रभागी कर्नाटक येथील हंपी पीठाचे शंकराचार्य विद्यारण्य भारती स्वामीजी व बंगळुरू येथील शृंगेरी मठ महासंस्थानचे शंकराचार्य विद्याभिनव शंकरभारती महास्वामीजी सजविलेल्या रथात विराजमान झाले होते. भाविक त्यांचे दर्शन घेत होते. माई महाराज व शिष्य सहभागी झाले होते.
अ. भा. बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या १२५ युवक-युवतींच्या ब्रह्मगर्जना ढोल पथकाने वातावरण दणाणून सोडले होते. एका वाहनात बेगमपुरा येथील वनिता पत्की व ब्रह्मवृंदांनी ‘ ते रक्त ब्राह्मणी होते’ असे शौर्यगीत गाऊन रंगत आणली. भगवान परशुराम, बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषेतील बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले. ‘भारताच्या नवनिर्माणात ब्राह्मणांचे योगदान’ या विषयावरील चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. चित्ररथाद्वारे काही संघटनांनी ‘पाणी वाचवा’, ‘वृक्ष लावा’ असा सामाजिक संदेश दिला. शोभायात्रेत महिलांची संख्याही वाखाणण्याजोगी होती. शोभायात्रा शहागंज, सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडीमार्गे औरंगपुऱ्यातील परशुराम चौकात पोहोचली.
शोभायात्रेत अनिल पैठणकर, गोपाळ कुलकर्णी, अप्पा कुलकर्णी, संजय मांडे, अनिल खंडाळकर, विनिता हर्सूलकर, धनंजय पांडे, पुरुषोत्तम भाले, प्रमोद झाल्टे, श्रीराम वरूडकर, सुभाष बिंदू, जीवन गुरू भोगावकर, अत्रे गुरुजी, सुरेश देशपांडे, विजेंद्र जोशी, अनिल मुळे, मिलिंद पिंपळे, देवांग जोशी, प्रथमेश कुलकर्णी, डॉ. संतोष सवई, मिलिंद दामोदरे, डॉ.कसबेकर, विजय मिश्रा, अॅड.अनंत भालकीकर, पळसकर, सचिन देशपांडे, श्रीकांत सोनटक्के, अॅड.गोपाळ पांडे, आशिष सुरडकर, विनोद मांडे, बक्षी, सचिन वाडे पाटील, रत्नप्रभा पोहेकर, श्रीकृष्ण जोशी, नंदकुमार पारीक, राजेंद्र शर्मा, अनिल शर्मा, प्रवीण शर्मा, विजया कुलकर्णी, सुषमा पाठक, अंजली गोरे, भारती चोबे तसेच ब्राह्मण युवक मंडळ, कण्व ब्राह्मण समाज, शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण सभा, चित्पावन ब्राह्मण मंडळ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, पुरोहित संघटना, विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था, नागेश्वरवाडी ब्राह्मण युवक मंडळ, ब्रह्मवृंद मित्रमंडळ, चाणक्य प्रतिष्ठान, ब्राह्मण महिला मंच, ब्राह्मण युनिटी, उत्तर भारतीय ब्राह्मण सेवा समिती, स्वाभिमानी ब्राह्मण सेवाभावी संस्था, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क, वेद मित्रमंडळ, जागृत ब्राह्मण संघ, सर्वशाखीय ब्राह्मण सभा, सिडको युवक मंडळ, ब्राह्मण सेवा संघ, अ.भा. पेशवा संघटना, राजस्थानी विप्र मंडळ, स्वाभिमानी पेशवा संघटना आदींचे पदाधिकारी सहभागी झाले.
वैचारिक क्रांती घडवावी- शंकराचार्य
रक्तक्रांती नव्हे, वैचारिक क्रांतीची आवश्यकता आहे. ब्राह्मणांनी वैचारिक क्रांती घडवून आपल्या समाजाबरोबर अन्य सर्व समाज, राष्ट्राचा उत्कर्ष साधावा, असा मौलिक उपदेश बंगळुरू येथील शृंगेरी मठ महासंस्थानचे शंकराचार्य विद्याभिनव शंकरभारती महास्वामीजी यांनी केला.
ब्राह्मण समाज परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी सकाळी औरंगपुरा येथील परशुराम चौकात परशुराम स्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी शंकराचार्यांनी ब्रह्मवृंदांना मार्गदर्शन केले. यावेळी हंपी कर्नाटक येथील शंकराचार्य विद्यारण्य भारती स्वामीजी यांची विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी, वेद मंत्रोच्चारात शंकराचार्यांच्या हस्ते परशुरामांची प्रतिमा व स्तंभाचे पूजन करण्यात आले. प्रारंभी उत्सव समितीचे प्रमुख गोपाळ कुलकर्णी यांनी शंकराचार्यांची पूजा केली. प्रास्ताविक अनिल पैठणकर यांनी केले.
४सूत्रसंचालन प्रमोद झाल्टे यांनी केले. सुभाष बिंदू यांनी आभार मानले. पं.विश्वनाथ दाशरथे यांनी पसायदान गाऊन या सोहळ्याला उंचीवर नेऊन ठेवले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने सकाळी वाहन रॅली काढण्यात आली. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापासून निघालेल्या वाहन रॅलीत महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल मुळे, मिलिंद पिंपळे यांच्यासह शेकडो युवक सहभागी झाले होते.
अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघानेही दुचाकी रॅली काढली होती. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकांनी भगवा ध्वज हाती घेतला होता. महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.देवांग जोशी, पंकज पाठक, प्रथमेश कुलकणी यांनी रॅलीचे नेतृत्व केले.