औरंगाबाद : मराठवाड्यात ४ वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेरूळ महोत्सव घेण्यात आला नाही. यावर्षी पावसाळ्यानंतर वेरूळ महोत्सव घेण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात ३ दिवस वेरूळ महोत्सव घेण्याचा संभाव्य विचार आजच्या बैठकीत झाला. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर महोत्सवाला ब्रेक लागू शकतो. देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी १९९४ पासून वेरूळ येथे महोत्सव घेण्यास सुरुवात झाली. वेरूळ येथे तब्बल १४ वर्षे हा महोत्सव साजरा करण्यात आला. वेरूळ महोत्सवात कला सादर करण्यासाठी राष्ट्रीय कलाकारांनी हजेरी लावली. २००८ मध्ये वेरूळ महोत्सव मुंबई बॉम्बस्फोटामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर २ वर्षे वेरूळ महोत्सव झाला नाही. २०११ मध्ये ४ दिवस सोनेरी महल येथे महोत्सव घेण्यात आला. त्या महोत्सवावर १ कोटी ४५ लाखांचा खर्च झाला. २०१२ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेरूळ महोत्सव घेतला गेला नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे २०१३ ते २०१५ या ३ वर्षातही प्रशासनाने वेरूळ महोत्सव घेण्याचा विचार केला नाही. गेल्यावर्षी मुंबईला महोत्सव घेण्याप्रकरणी बैठक झाली होती; परंतु जिल्हा प्रशासनाने महोत्सव का रद्द केला, याचे कारण आजपर्यंत जाहीर केलेले नाही. यावर्षीदेखील महोत्सवाबाबत अनेक शंका आहेत. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे प्रशासनाने वेरूळ महोत्सव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वेरूळ महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक अध्यक्ष विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत झाली. आॅक्टोबरमध्ये कोजागरी पौर्णिमेपासून ३ दिवस हा महोत्सव घेतला जावा, तसेच वेरूळ आणि सोनेरी महल या ठिकाणी महोत्सव घेण्यावर चर्चा झाली. वेरूळ महोत्सवासाठी सुमारे २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या बैठकीला उपायुक्त जितेंद्र पापळकर, पर्यटन विभागाचे चंद्रशेखर जैस्वाल, अण्णासाहेब शिंदे यांच्यासह उद्योजक, व्यापारी आदींची उपस्थिती होती.
वेरूळ महोत्सव पावसाळ्यानंतर?
By admin | Published: June 22, 2016 12:34 AM