वरुणराजा बरसला
By Admin | Updated: July 4, 2014 00:22 IST2014-07-03T23:54:14+5:302014-07-04T00:22:04+5:30
हिंगोली : गेल्या महिनाभरापासून बरसेल- बरसेल या अपेक्षेने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना गुरूवारी थोडासा दिलासा मिळाला.

वरुणराजा बरसला
हिंगोली : गेल्या महिनाभरापासून बरसेल- बरसेल या अपेक्षेने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना गुरूवारी थोडासा दिलासा मिळाला. जिल्ह्यातील विविध भागात सायंकाळी ४ नंतर वरुणराजा बरसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
खरीप हंगामास सुरूवात झाली असली तरीही जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून चांगला पाऊस झाला नसल्याने हा हंगामच संकटात आला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेने ग्रासला गेला आहे. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना ३ जुलै रोजी थोडासा दिलासा मिळाला. हिंगोली शहरात गुरूवारी सायंकाळी ४ च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. नगरपालिकेच्या वतीने नाले सफाईची मोहिम राबविण्यात आली नसल्याने या नाल्या तुंबल्या होत्या. परिणामी नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहतांना दिसून आले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आरामशीन रोड, खुराणा पेट्रोलपंप परिसर, सराफा लाईन आदी भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाण्याचे डोह साचले होते. या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.
वसमत येथे सायंकाळी ४ च्या सुमारास हलका पाऊस झाला. सेनगाव येथे दुपारी ३ च्या सुमारास रिमझीम पाऊस झाला. तर कळमनुरी येथे दुपारी २ वाजता दोनच मिनिटे रिमझीम पाऊस झाला. औंढ्यात मात्र पाऊस झाला नाही.
दरम्यान, शहरासह परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी खरीपाच्या पेरण्या करण्या इतपत पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटलेली नाही. चालू वर्षी पावसाला सुरूवात झाली हीच काय ती एक शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब ठरली. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पावसाची स्थिती
तालुका गतवर्षीचालू वर्षी हिंगोली२९९.९३१७.७२
कळमनुरी२४८.२६८.३३
सेनगाव२९९.६२३२.५
वसमत२८२.९४१५.७१
औंढा ना.३१२.६२३६.२५
एकूण२८८.६६२२.१२
पेरण्या लायक पाऊस नाही
हिंगोली शहरात सायंकाळी ४ च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांना आले तळ्याचे स्वरुप
हिंगोलीत नगरपालिकेच्या वतीने नाले सफाई मोहिम राबविण्यात आली नसल्याने रस्त्यावर पाणी.
रस्त्यांवर पाणी साचल्याने पाण्यातून वाट काढताना नागरिकांना करावी लागली कसरत.
पावसामुळे भाजी मंडईमधील व्यापारी व बाजार समितीमधील शेतकऱ्यांची उडाली धांदल.
कळमनुरी शहरात दुपारी २ वाजता तर सेनगाव येथे ३ वाजता आणि वसमत येथे सायंकाळी ४ वाजता रिमझीम पाऊस.