वेरूळ-अजिंठा महोत्सव यंदा बारगळणार?

By Admin | Updated: November 6, 2014 01:15 IST2014-11-06T01:15:50+5:302014-11-06T01:15:50+5:30

औरंगाबाद : पर्यटनवाढीच्या दृष्टीने, तसेच पर्यटकांसह औरंगाबादच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून सुरू झालेला व अधूनमधून होणारा नृत्य-संगीताचा वेरूळ महोत्सव

Varul-Ajantha Festival will be revived this year? | वेरूळ-अजिंठा महोत्सव यंदा बारगळणार?

वेरूळ-अजिंठा महोत्सव यंदा बारगळणार?



औरंगाबाद : पर्यटनवाढीच्या दृष्टीने, तसेच पर्यटकांसह औरंगाबादच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून सुरू झालेला व अधूनमधून होणारा नृत्य-संगीताचा वेरूळ महोत्सव यंदा होणार की नाही,याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
जगप्रसिद्ध कैलास लेण्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथे हा महोत्सव सुरू झाला. रात्रीच्या वेळी आणि ऐन थंडीच्या दिवसात होणारा महोत्सव गैरसोयीचा ठरू लागल्याने नंतर तो २००२ पासून औरंगाबाद शहरातील विद्यापीठ परिसरात १७ व्या शतकात बांधल्या गेलेल्या ऐतिहासिक सोनेरी महलच्या पार्श्वभूमीवर वेरूळ-अजिंठा औरंगाबाद महोत्सव या नावाने सुरू झाला. यामध्ये स्थानिक कलावंतांबरोबरच देशातील प्रतिष्ठित आणि नामांकित कलावंतांना पाचारण करण्यात येते. ऐतिहासिक स्थळाच्या पार्श्वभूमीवर बहरत असलेला हा महोत्सव गेल्या वर्षी होऊ शकला नाही.
आर्किटेक्ट असलेल्या आणि कलेमध्ये रुची असलेल्या जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी हा महोत्सव पुन्हा सुरू करण्याबाबत सहा महिन्यांपूर्वी सूतोवाच केले होते; मात्र नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या कामामुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही वेळ मिळाला नाही. वेरूळ-अजिंठा औरंगाबाद फेस्टिव्हलचे आयोजन करणाऱ्या समितीची बैठकही यासंदर्भात होऊ शकली नाही. राज्य पर्यटन महामंडळाचे सहकार्य असलेला हा महोत्सव यंदा त्यांच्याकडूनही दुर्लक्षित राहिला.
हा महोत्सव साधारणत: डिसेंबर- जानेवारी महिन्यात होतो. आॅक्टोबर महिन्यापासून पर्यटन राजधानीतील सीझन चालू होतो. देश- विदेशातील नागरिक भेटी देतात. महोत्सवाच्या तारखांची आधी काही काळ प्रसिद्धी झाली तर ते पर्यटकांच्या सोयीचे असते. मात्र आता नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी या महोत्सवाबाबत एकही बैठक किंवा अगदी चर्चाही झालेली नाही. त्यामुळे महोत्सवाच्या तारखा ठरून त्याची प्रसिद्धी, तसेच कलावंतांच्या तारखा घेण्याचे अवघड काम होणे अशक्यच दिसत आहे. महोत्सव करावयाचा झाल्यास त्याची युद्धपातळीवर तयारी करावी लागेल, अन्यथा यंदाचा महोत्सव बारगळल्यात जमा आहे.
या संदर्भात राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 1
२०१२ मध्ये २६ ते २९ जानेवारीदरम्यान झालेल्या फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर, बासरीवादक पं. रोणू मुजुमदार, सुफी व गझल गायक कैलास खेर आदींसह बड्या कलावंतांनी हजेरी लावून हा सोहळा दिमाखदार करण्यात वाटा उचलला.
2अर्थात त्यावेळी दिलीप शिंदे या कलाप्रेमी अधिकाऱ्याच्या पुढाकारामुळे हा महोत्सव होऊ शकला. २४०० चौरस फुटाचे भव्य स्टेज आणि सुमारे दहा हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हा महोत्सव खऱ्या अर्थाने रंगला होता; मात्र २०१३ साली हा महोत्सव होऊ शकला नाही. निधीची अडचण आणि इतर सबबी सांगण्यात आल्या. त्यामुळे औरंगाबादच्या रसिकांना दर्जेदार कलावंतांचा आविष्कार पाहण्या-ऐकण्याची संधी मिळाली नाही.
हा महोत्सव घेण्याचा विचार जाहीर केला आहे. आता या समितीची बैठक घेऊन त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहायला हवे. समितीच्या बैठकीनंतरच काहीतरी ठरेल.
- विक्रमकुमार, जिल्हाधिकारी

Web Title: Varul-Ajantha Festival will be revived this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.