वैजापूर तालुक्यात अडीच हजार हेक्टरला फटका
वैजापूर : गेल्या दोन दिवसांत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने २,५७६ हेक्टर क्षेत्रावरील रबी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील २९ गावांतील रबीच्या बागायती व जिरायती क्षेत्रावर पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
शहर व ग्रामीण भागात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक ठिकाणी सोंंगणीला आलेला गहू व मका पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. याशिवाय कांदा, हरभरा व फळ पिकांचेही नुकसान झाले.
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश तलाव भरलेले आहेत. या पाण्याचा उपयोग पिण्यासोबतच सिंचनासाठी होत असल्याने यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, कांदा व हरभरा आदी पिकांची लागवड केली आहे. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यानुसार गुरुवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील १,८०३ हेक्टर बागायती क्षेत्रावरील व ७७३ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधून नुकसानीबाबत कळवावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.