विनापरवाना अडत वसुली !
By Admin | Updated: May 25, 2014 01:09 IST2014-05-25T00:55:53+5:302014-05-25T01:09:33+5:30
दिनेश गुळवे , बीड शहरातील भाजी मंडईतील अडत व्यापारी नियमापेक्षा अधिक अडत घेत असल्याने त्यांचे सर्वच परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केले होते.

विनापरवाना अडत वसुली !
दिनेश गुळवे , बीड शहरातील भाजी मंडईतील अडत व्यापारी नियमापेक्षा अधिक अडत घेत असल्याने त्यांचे सर्वच परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केले होते. यानंतर व्यापार्यांनी खेटे घालूनही त्यांना परवाना मिळत नसल्याने सध्या विनापरवानाच शेतकर्यांकडून अडत वसुली सुरू आहे. कृउबा व नगरपालिका यांच्यातील त्रांगड्यामुळे भाजी मंडई समस्यांचे माहेरघर बनली आहे. बीड शहरातील खासबाग परिसरात व्यापार्यांसाठी नगरपालिकेने गाळे बांधून देऊन येथे भाजी मार्केट उभारले आहे. येथे व्यापार करण्यासाठी ८५ व्यापार्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाने दिले होते. येथील व्यापारी शेतकर्यांकडून नियमापेक्षा अधिक ‘अडत’ वसूल करीत असल्याचा मुद्दा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे अॅड. अजित देशमुख यांच्यासह शेतकर्यांनी उपस्थित केला होता. यानंतर या प्रकरणात तात्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर कृउबाने सर्व परवाने २८ नोव्हेंबर २०१३ रोजी रद्द केले होते. येथील गाळे नगरपालिकेने बांधून दिले असले परवाना कृउबाने दिला होता. असे असले तरी कृउबा कडून नियमन केले जात नव्हते, तसेच येथे काहीच सुविधा देण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे कृउबा समितीला परवाना देण्याचा अधिकार काय? असा मुद्दाही उपनिबंधक कार्यालयाने उपस्थित केला होता. सध्या येथील व्यापार्यांकडे परवाने नसतानाही ते आठ ते दहा टक्के अडत वसूल करीत असून यामुळे शेतकर्यांची लूट होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश धांडे यांनी केला आहे. मंडईत शौचालय, भाजीपाला ठेवण्यासाठी सावली, पार्किंग नाही, जरासाही पाऊस आला तर व्यापार्यांचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे भिजतात तसेच मंडईत घाणीचे साम्राज्य आहेत. अशा अनेक समस्यांनी ही मंडई ग्रासली असून वारंवार खेटे घालूनही व्यापार्यांना परवाना मिळत नसल्याने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. जमिरुद्दीन बागवान यांनी सांगितले. तर, कृउबा सचिव आर. पी. बहिर म्हणाले की, व्यापारी नियमांची पुर्तता करीत नसल्याने त्यांना परवाने दिले जात नाहीत. येथे आठ ते दहा टक्के अडत घेऊन शेतकर्यांची लूट केली जात होती.यामुळे कारवाई करण्यात आली होती. भाजीमंडईत असलेल्या गाळ्यामध्ये हवा येत नसल्याने भाजीपाला गाळ्यात ठेवला की, एका दिवसात सडतो. तर, बाहेर ठेवल्यास भाजीपाला चोरी जातो. येथे सावलीही नसल्याने उन्हात काम करावे लागते. येथील गाळे नगर पालिकेने बांधले असले तरी परवाना कृउबाचा आहे. त्यामुळे येथील नियमन कोणी करायचे? या त्रांगड्यात सध्ये येथे व्यापार्यांसह ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.