छत्रपती संभाजीनगर: उद्धवसेनेच्यावतीने क्या, हुआ तेरा वादा? या आंदोलनांतर्गत शनिवारी शिंदेसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नारळीबाग येथील कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन दिले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कर्जमाफी दिली नाही. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मात्र शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करण्याचे सांगितले. यासोबत सरकारने शेतकरी सन्मान योजना १२ हजार रुपयांवरुन १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. एक रुपयांत पीक विमा ही योजना गुंडाळण्यात आली. राज्यात मागील सहा महिन्यात एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्यावतीने, क्या, हुआ तेरा वादा? हे आंदोलन छेडले आहे.
या आंदोलनांतर्गत दोन दिवसापूर्वी भाजपा कार्यालयात जाऊन बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले. यावेळी उद्धवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी परस्परविरोधात घोषणाही दिल्या होत्या. आज शनिवारी सकाळी उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयावर क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन केले. यावेळी आ. जैस्वाल यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले की, शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीत सतत नुकसान होत असते. यामुळे सरकार आणि प्रशासनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर सम्येकडे लक्ष द्यावे, केवळ पोकळ आश्वासने आणि घोषणाबाजी करण्याऐवजी तात्काळ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, राज्यातील जनतेला न्याय द्या, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार जैस्वाल यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
या आंदोलनात शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,आनंद तांदुळवाडीकर, लक्ष्मीनारायण बाखरिया,गोपाळ कुलकर्णी, सुगंधकुमार गडवे, राजेंद्र दानवे, नरेश मगर, सुरेश पवार, विनायक देशमुख, संदेश कवडे, संजय हरणे, सिताराम सुरे, सचीन खैरे, बन्सी जाधव आदींनी सहभाग नोंदविला.