छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या १५ टक्के बस दरवाढीच्या निर्णयाविरोधात उद्धवसेना आक्रमक झाली आहे. भाडेवाढीच्या निषेधार्थ आज शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या गेटवर उद्धवसेनेने चक्काजाम आंदोलन केले. लालपरीचे भाडे वाढल्याने प्रवाशांवर अतिरिक्त भुर्दंड पडत आहे, भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, परिवहन मंत्री हाय.. हाय.. अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
दानवे पुढे म्हणाले, राज्य शासनाने केलेली भाडेवाढ अन्यायकारी आहे. दोन महिन्यापूर्वी एसटी महामंडळ फायद्यात असल्याचे महामंडळाचे अध्यक्षांनी सांगितले होते. असे असताना एसटीची भाडेवाढ होणे म्हणजे सर्वसामान्य माणसाची राज्य सरकार लूट करत आहे. दुर्दैव म्हणजे राज्याच्या परिवहन मंत्र्यालाच सदरील भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती नसणे धक्कादायक असल्याचे दानवे म्हणाले. ही भाववाढ नियमाला धरून नाही.थोड्याफार प्रमाणात भाडे वाढ सामान्य नागरीक समजू शकतो. मात्र महामंडळ फायद्यात असताना अशा प्रकारे भाडेवाढ करणे शासनाचे अन्यायकारी धोरण असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली. राज्य सरकार अनेक अमिषे देत वायफळ खर्च करतं आहे, अशा वेळी भाडेवाढ करणे योग्य आहे का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
मंत्र्यांना प्रवाशांची व्यथा कळली नाहीपरिवहन खात्याच्या मंत्र्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर सुरुवातीला चमकोगिरी केली. एसटीने प्रवास केला मात्र त्यांना प्रवाशांची व्यथा कळलीच नाही, असा टोला दानवे यांनी प्रताप सरनाईक यांना लगावला. श्रीमंत नव्हे तर सर्वसामान्य माणूस या एसटीने प्रवास करतो. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील प्रवाशांच्या मुख्य प्रवासाचे साधन एसटी बस आहे. १५ टक्के भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. तसेच मराठवाड्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील बसस्थानकावर सदरील चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आज फक्त बसस्थानकाच्या गेटवर बस काही काळ थांबवून चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे.आगामी काळात राज्यभर पक्षाच्यावतीने चक्काजाम करून या शासनाला भाडेवाढ रद्द करण्यास भाग पाडू, असे आव्हान दानवे यांनी सरकारला दिले.
आंदोलनात राज्य संघटक चेतन कांबळे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर सुदाम मामा सोनवणे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, लक्ष्मीनारायण बखरिया, अशोक शिंदे, किशोर कच्छवाह, अरविंद धीवर, राजू इंगळे, चंद्रकांत गवई, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, शहर संघटक सचिन तायडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, माजी नगरसेवक विनोद सोनवणे,कल्याण चक्रनारायण, कान्हुलाल चक्रनारायण, कमलाकर आण्णा जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, तालुकाप्रमुख आनंद भालेकर, उपतालुकाप्रमुख विष्णु जाधव, उपशहरप्रमुख प्रितेश जैस्वाल, महिला आघाडी सहसंपर्क संघटक अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, लता पगारे, महानगर संघटक सुकन्या भोसले, उपजिल्हा संघटक सुनंदा खरात, अरुणा भाटी, माजी महापौर शिलाताई गुंजाळ, माजी नगरसेविका सीमाताई चक्रनारायण, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, विधानसभा समन्वयक रेणूका जोशी, रेणुका शहा, उपशहर संघटक सारिका शर्मा आदींचा सहभाग होता.