जुन्या वादातून दोन दुचाकी पेटविल्या, आरोपी तासाभरात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:39 IST2017-08-11T18:37:58+5:302017-08-11T18:39:50+5:30
दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एकाने चक्क दुस-याचा दोन दुचाकी पेटवून दिल्या. मात्र, अवघ्या तासाभरात बेगमपुरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने दुचाकी जाळणा-या या तरुणास अटक केली.

जुन्या वादातून दोन दुचाकी पेटविल्या, आरोपी तासाभरात कैद
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ११ : दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एकाने चक्क दुस-याचा दोन दुचाकी पेटवून दिल्या. मात्र, अवघ्या तासाभरात बेगमपुरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने दुचाकी जाळणा-या या तरुणास अटक केली. ही घटना बिस्मिल्ला कॉलनीत गुरुवारी (दि. १०) रात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास घडली.
मोहम्मद उमर फारुख मोहम्मद आरे (१९, रा.बिस्मिल्ला कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, बिस्मिल्ला कॉलनीत राहणारे मोहम्मद सत्तार मोहम्मद इस्तीहार हे १० आॅगस्ट रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांच्या कुटुंबियासह झोपले. रात्री दिड वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घरासमोर उभी दोन मोटारसायकली अज्ञाताने पेटवून दिल्या. गाड्यांनी पेट घेतल्याने उडालेल्या भडका आणि धुराने तक्रारदार यांच्या कुटुंबियास जाग आली. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारील लोक मदतीला धावले आणि त्यांनी पेटलेल्या दुचाकींवर पाण्याचा मारा करून आग विझविली.
यावेळी बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी हे गस्तीवर होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहचले. हाश्मी यांनी तक्रारदार यांची चौकशी केली तेव्हा दोन दिवसापूर्वी त्यांच्या मुलाचे कॉलनीतील एका मुलासोबत भांडण झाले होते असे सांगितले. तसेच तो या मागे असण्याची शक्यता वर्तविली.
यानंतर त्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटिव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून वाहने जाळण्याची घटना नेमकी कशी घडली, हे पाहिले. तेव्हा त्यांना एक तरुण दोन्ही दुचाकींना पेटविल्यांनतर गल्लीतून पळून गेल्याचे दिसले. सीसीटिव्हीतील फुटेजवरुन तक्रारदार यांनी उपस्थित केलेली शंका खरी ठरली. दोन्ही दुचाकी पेटवून देताना आरोपी मोहम्मद उमर फारूख हा सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाला. त्याची ओळख पटल्याने पोलिसांनी लगेच त्याच्या घरात जाऊन त्यास ताब्यात घेतले. अवघ्या तासाभरात आरोपीला अटक करण्यात बेगमपुरा पोलिसांना यश आल्याने तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले.