आखाडा बाळापूर परिसरातील दोन हजार गुंतवणूकदार झाले बेघर
By Admin | Updated: July 24, 2014 00:29 IST2014-07-23T23:57:24+5:302014-07-24T00:29:17+5:30
चंद्रमुनी बलखंडे,. आखाडा बाळापूर अवघ्या दोन- तीन वर्षांत तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लि. च्या बाळापूर येथील कार्यालयास एजंटांनी टाळे ठोकून

आखाडा बाळापूर परिसरातील दोन हजार गुंतवणूकदार झाले बेघर
चंद्रमुनी बलखंडे,. आखाडा बाळापूर
अवघ्या दोन- तीन वर्षांत तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लि. च्या आखाडा बाळापूर येथील कार्यालयास एजंटांनी टाळे ठोकून परिसरातील दोन हजार गुंतवणूकदारांना चुना लावला असून त्यांनाच आता न्यायालयीन लढा लढण्याचा मोलाचा सल्लाही एजंट देत आहेत.
गुंतवणूकदारास तिप्पट रक्कम करून देतो, म्हणून सर्वसामान्यांना लाखो रुपये गुंतवणूक करावयास लावणाऱ्या एजंटांनी आखाडा बाळापूर येथे मध्यवर्ती कार्यालय स्थापन केले होते. प्रशस्त बनवलेल्या कार्यालयात बसून सर्वसामान्यांना चुना लावण्याचे काम या एजंटामार्फत होत होते. अवघ्या दोन-तीन वर्षात रक्कम तिप्पट होणार असल्याने गुंतवणूकदारांनी जमीन विक्री, बँकेतून कर्ज, मुलीच्या लग्नासाठी जमवलेली पुंजी, निवृत्तीवेतनाची रक्कम, खाजगी सावकारी या माध्यमातून जमवलेली रक्कम थेट केबीसीत गुंतवणूक करून जवळपास दोन हजारांच्यावर गुंतवणूकदारांनी रक्कम जमा केली. यामध्ये १७२०० ते ८६००० रुपयांचा योजनेचा भरणा जास्त आहे. याची मोजणी केली तर एकट्या आखाडा बाळापूर कार्यालयांतर्गत पन्नास कोटींच्यावर रक्कम जाते.
जरोडा, पिंप्री, घोटा, बोथी ही गावे तर अख्खे केबीसीमध्ये बुडाले तर परिसरातील प्रत्येक गावात दहा ते पंधरा गुंतवणूकदार यामध्ये अडकले. याची माहिती घेतली असता गुंतवणूकदारांकडूनच कंपनीने दिलेली कागदपत्रे, बॉण्ड, चेक परत एजंट जमा करीत असल्याचे समजले. संपूर्ण महाराष्ट्रच या कंपनीने बुडविला असल्याने कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करणाऱ्या गुंतवणुकदारांची संख्या वाढत आहे. पोलिसही कागदपत्रे जमा करीत असल्याने आपल्यावरही कारवाई होईल. या भीतीने अगोदरच कागदपत्रे जमा करून एजंट सहिसलामत सुटण्याच्या मार्गावर आहेत.
यामुळेच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास गुंतवणूकदारांकडे पुरावेच उरले नसल्याने बाळापूर परिसरात एकानेही गुन्हा दाखल केला नाही. आखाडा बाळापूर कार्यालयातील मुख्य एजंटाशी संपर्क साधला असता आम्ही वकीलांमार्फत न्यायालयात जाण्यासाठी कागदपत्रे जमा करीत असल्याचे सांगुन आम्हीही न्यायासाठी झगडत असल्याचे सांगितले.
अनेकजण बळीचे बकरे
सगे नातेगोते, मित्र, वरिष्ठ अधिकारी, संस्थाध्यक्ष यांचा मान राखण्यासाठी अनेकांनी इच्छा नसताना पैसे गुंतवल्याने बेघर होण्याची वेळ आली आहे. तर अनेकांना आपल्या नावावर एजंटांनी साखळी (चेन) बनविण्यासाठी व दुसऱ्याचेच पैैसे टाकले असल्याचे आता समोर येत असल्याने तेही बळीचे बकरे ठरत आहेत.