दोन हजार शेतकऱ्यांनी घेतली आत्महत्या हद्दपार करण्याची शपथ
By Admin | Updated: December 12, 2014 00:53 IST2014-12-12T00:50:56+5:302014-12-12T00:53:00+5:30
उमरगा : शेती व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. नैसर्गिक कारणांमुळे संकटे उभी ठाकली असली तरी याचा खंबीरपणे मुकाबला

दोन हजार शेतकऱ्यांनी घेतली आत्महत्या हद्दपार करण्याची शपथ
उमरगा : शेती व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. नैसर्गिक कारणांमुळे संकटे उभी ठाकली असली तरी याचा खंबीरपणे मुकाबला करण्याचा निर्धार करतानाच सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या हद्दपार करण्याची शपथ घेतली.
गुरूवारी येथील तालुका कृषी कार्यालय व कृषी विभाग प्रकल्प संचालक ‘आत्मा’ यांच्या वतीने गटप्रमुखांच्या बळकटीकरणासाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिरात शेतकऱ्यांनी हा निर्धार व्यक्त केला. शिबिराचे उद्घाटन विभागीय अधिकारी रवींद्र गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष चोले, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अर्चनाताई जिंतूरकर, अॅड. अमोल रणदिवे, भारत गर्जे, तहसीलदार उत्तमराव सबनीस, तालुका कृषी अधिकारी हनुमंतराव गोरे, मंडळ अधिकारी मुरलीधर जाधव, विजयकुमार कुलकर्णी, पर्यवेक्षक भानुदास ढोबळे, कृषी अधिकारी नंदकिशोर डांगे, प्रदीप भोसले आदींची उपस्थिती होती.
प्रशिक्षणासाठी १८०० गटप्रमुखांसह शेतकऱ्यांनी सभासद नोंदणी केली होती. नापिकीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असले तरी शेतकऱ्यांनी आशावादी रहायला हवे. प्रशासनाबरोबरच शासन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. अशावेळी हिंमत न हारता या संकटाचा मुकाबला करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. गटांचे कर्तव्य, निवड, अधिकार याबाबत प्रकल्प संचालक चोले यांनी तर कंपनी स्थापना, व्यवहार, त्याचे फायदे आदींबाबत अॅड. रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. बँक खात्याचा योग्य वापर, आर्थिक व्यवहार, कर्ज प्रस्ताव, गटांचे ठराव, रेकॉर्ड ठेवण्याच्या पध्दती याबाबत खामसवाडी येथील भारत गर्जे यांनी मार्गदर्शन केले. तर शेती व्यवसायाशी सलग्नीत दुग्ध व्यवसाय, बंदिस्त शेळीपालन, कृषी उत्पादीत मालावर प्रक्रिया, आधुनिक शेती, चारा निर्मिती व त्याचा काटकसरीने वापर याबाबत जिंतूरकर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी हनुमंत गोरे यांनी, सूत्रसंचालन विजयकुमार कुलकर्णी तर शेवटी मंडल कृषी अधिकारी मुरली जाधव यांनी आभार मानले. यावेळी शहरासह तालुक्यातीच्या ग्रामीण भागातून शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)