दोन दिवसांत ११८ बसेस ५० हजार कि.मी. धावल्या, हाती पडले फक्त ११ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:02 AM2021-04-12T04:02:02+5:302021-04-12T04:02:02+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. हा विळखा कमी करण्यासाठी कडक निर्बंध पाळण्यात येत आहे. या सगळ्यामुळे ...
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. हा विळखा कमी करण्यासाठी कडक निर्बंध पाळण्यात येत आहे. या सगळ्यामुळे प्रवाशांकडून प्रवास टाळण्यावर भर दिला जात आहे. परिणामी, ‘एसटी’ला आर्थिक फटका बसत आहे. एकट्या सिडको बसस्थानकातून गेल्या दोन दिवसांत ११८ बसेस ५० हजार ७९१ कि.मी. धावल्या. परंतु यातून केवळ ११ लाख ७४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रत्यक्षात २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते.
कोरोनाच्या भीतीने प्रवाशांची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. कायम गजबलेल्या बसस्थानकात आता शुकशुकाट पहायला मिळत आहे. त्यात शनिवारी आणि रविवारी कडक निर्बंध आहे. त्यामुळे या दिवशी तर ‘एसटी’चा चक्का जाम होत असल्याची स्थिती आहे. सिडको बसस्थानकाच्या ताफ्यात ८९ बसगाड्या आहेत. परंतु रोज ५८ ते ६० बसेस धावत आहेत. ज्या बसेस धावतात, त्याचे उत्पन्नही ५० टक्के घटले आहे. म्हणजे तोटा सहन करून प्रवाशांना सेवा देण्याची कसरत एसटी महामंडळ करीत आहे. एका दिवशी २४ ते २५ हजार कि.मी. बसेस धावत आहे. परंतु उत्पन्न केवळ ५ ते ६ लाख रुपये मिळत आहे.
--------
आगारातील एकूण बसेसची संख्या - ८९
दोन दिवसांत धावलेल्या बसेस ११८
फेऱ्या झाल्या आगारामध्ये-२३६
पैसे मिळाले दोन दिवसात-११.७४ लाख रुपये
---------
दिवसाला ५ ते ६ लाखांचा तोटा
१. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसाला ५ ते ६ लाखांचा तोटा होत आहे. गेल्या दोन दिवसांत ११ लाखांचा तोटा झाल्याची माहिती सिडको बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापकांनी दिली.
२. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. बसस्थानकातून जालना, बीडसह ग्रामीण भागांतील बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.
३)प्रवाशांअभावी जवळपास ४० टक्के बसेस या आगारातच उभे करण्याची वेळ ओढवत आहे. बसस्थानकावर तासभर बस उभी करूनही प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे.
--
निम्मेच कर्मचारी कामावर
१.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला आहे. ६५८ कर्मचारी आहेत. परंतु रोज साधारण ३०० ते ३५० कर्मचारीच येत आहे.
२) बसच्या फेऱ्या होत नसल्याने चालक-वाहकांना सुटी देण्याची वेळ ओढावत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
--
उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न
कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे बसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. तरीही ज्या बसेस धावतात, त्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केला जात आहे.
- एल.व्ही. लोखंडे, आगार व्यवस्थापक, सिडको बसस्थानक