जुलैअखेर बारावीचा निकाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST2021-07-29T04:05:11+5:302021-07-29T04:05:11+5:30
शाळांचे काम संपले, बोर्डाची प्रक्रिया सुरू, राज्य मंडळाच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष ---- औरंगाबाद : शाळा-महाविद्यालयांनी बोर्डाच्या संगणकीय प्रणालीवर बारावीचे ...

जुलैअखेर बारावीचा निकाल?
शाळांचे काम संपले, बोर्डाची प्रक्रिया सुरू, राज्य मंडळाच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
----
औरंगाबाद : शाळा-महाविद्यालयांनी बोर्डाच्या संगणकीय प्रणालीवर बारावीचे मूल्यांकन ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता बोर्डाकडून निकालाच्या पुढील प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी पुढील दोन दिवस लागणार असून महिनाअखेर निकाल लागू शकतो. निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
मूल्यांकनाचे काम ९९.९४ टक्के पूर्ण झाले. औरंगाबाद विभागीय मंडळातील १ लाख ४६ हजार ७०५ विद्यार्थ्यांचे, तर लातूर विभागीय मंडळातील ७८ हजार ३२ विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाइन भरले गेले. त्रुटींची पूर्तता, दुरुस्त्यांनंतर मराठवाड्यातील २ लाख २४ हजार ७३७ विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे. बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने म्हणाल्या, शाळांचे काम संपले, आता बोर्डाचे काम सुरू आहे. त्याला दोन-तीन दिवस लागतील. कधीपर्यंत निकाल लागेल यावर त्या म्हणाल्या, असे वाटते की, ३० जुलैपर्यंत किंवा ३१ जुलैपर्यंत निकाल लागावा. मात्र, तो राज्य मंडळाचा अधिकार आहे. कधी निकाल लागेल हे राज्य मंडळाकडूनच जाहीर होईल, तोपर्यंत निश्चित सांगता येणार नाही.