तुळजापुरात पाच तास आगीचे तांडव
By Admin | Updated: December 19, 2014 00:55 IST2014-12-19T00:43:47+5:302014-12-19T00:55:56+5:30
तुळजापूर : शहरातील पंढरपूर गल्लीतील दोन घरांसह दोन दुकानाला गुरूवारी पहाटे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले़ जवळपास पाच तास

तुळजापुरात पाच तास आगीचे तांडव
तुळजापूर : शहरातील पंढरपूर गल्लीतील दोन घरांसह दोन दुकानाला गुरूवारी पहाटे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले़ जवळपास पाच तास सुरू असलेले आगीचे तांडव विझविण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाची मोठी धावपळ उडाली़ घरमालक श्रीकांत नाईक यांच्या दक्षतेमुळे यात जिवित हानी झाली नाही़
तुळजापूर शहरातील पंढरपूर गल्लीत राहणारे श्रीकांत नाईक , सुधाकर नाईक यांचे घर आहे़ वरच्या मजल्यावर बंगाली सुवर्ण कारागिर भाड्याने राहतात़ तर एक दुकान ब्युटीपार्लरसाठी भाड्याने दिलेले आहे़ सुधाकर नाईक यांनी संपूर्ण घर भाड्याने दिले आहे़ तर तळमजला व्यापाऱ्यांना माल ठेवण्यासाठी दिला आहे़ बुधवारी रात्रीच्या सुमारास नाईक हे कुटुंबासह घरात झोपले होते़ गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यावेळी श्रीकांत नाईक यांनी पत्नी, मुलासह भाडेकरूंना उठवून घराबाहेर काढले़ नाईक यांचे घर जळून खाक झाल्यानंतर ही आग सुधाकर नाईक यांच्या घराला लागली़ नाईक यांनी भाडेकरूंना उठवून घराबाहेर काढले़ या भीषण आगीच्या दूरवरील शहापुरे यांच्या घरालाही लागल्या होत्या़ त्यात त्यांच्या घराच्या खिडक्या, दरवाजाचे नुकसान झाले आहे़ आगीची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले़ नगर पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी आणून पाणी मारण्यात आले़ पहाटे साडेपाच, सहा वाजेपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच होते़ उस्मानाबाद येथील अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग पूर्णत: अटोक्यात आली़ या आगीत नाईक यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, बेड, ब्युटीपार्लर, कारागिर यांचे साहित्य, मौल्यवान वस्तू, मशनरी, फर्निचर असे जवळपास सव्वा कोटी रूपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज नाईक यांनी वर्तविला आहे. (वार्ताहर)४
श्रीकांत नाईक यांनी घराला आग लागल्यानंतर घरातील मंडळी व भाडेकरूंना उठवून बाहेर काढले़ तसेच स्वत:च्या घरातील, भाडेकरूच्या घरातील तिन्ही गॅससिलेंडर बाहेर सुरक्षित स्थळी आणून ठेवले़ हे गॅस सिलेंडर आगीच्या कचाट्यात सापडले असते तर मोठी दूर्घटना झाली असती़ ती नाईक यांच्या समस सूचकतेमुळे टळल्याचे दिसून येत आहे़४
नाईक यांच्या घराला आग लागल्यानंतर नागरिकांनी या भागातील वीजपुरवठा खंडित करण्याबाबत वीजकंपनीला कल्पना दिली होती़ त्यानुसार या भागातील वीज बंद करण्यात आली़ वीज गेल्यानंतर अंधार पसरला तरी परिसरातील नागरीक, अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांनी अंधारात धावपळ करून साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आणली़