ट्रक झाडावर आदळून दोघे ठार
By Admin | Updated: March 1, 2016 23:48 IST2016-03-01T23:38:23+5:302016-03-01T23:48:50+5:30
वसमत/ शिरडशहापूर : औंढा- वसमत रस्त्यावरील भेंडेगाव शिवारात मंगळवारी सकाळी ट्रक उलटल्याने ट्रकमधील दोघे जागीच ठार झाले.

ट्रक झाडावर आदळून दोघे ठार
वसमत/ शिरडशहापूर : औंढा- वसमत रस्त्यावरील भेंडेगाव शिवारात मंगळवारी सकाळी ट्रक उलटल्याने ट्रकमधील दोघे जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक झाडावर आदळून हा अपघात झाला असल्याचे वृत्त आहे.
कामारेड्डीहून तांदळाची पोती घेऊन जाणारा ट्रक (क्र.एपी२५- व्ही. ३९८१) सुरतकडे जाण्यास निघाला होता. हा ट्रक वसमत तालुक्यातून जात असताना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास वसमत-औंढा मार्गावरील भेंडेगाव पाटीजवळ उलटला. रस्त्याच्या कडेच्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. अपघातात ट्रकमधील दोघे जागीच ठार झाले. शेख मजहर शेख महेबूब (वय ३५, रा. कामारेड्डी) व शे वाजीद शेख नूर (वय ३३, रा. सारंगपूर )अशी दुघर्टनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.
घटनेचे वृत्त समजताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील नाईक, रूपेश गरूड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मयताची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत प्रकरण नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)
दुचाकी अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू
डोंगरकडा : नांदेड- हिंगोली महामार्गावरील चिंचवाडी शिवारात मोटारसायकलवरून पाणी आणण्यासाठी जात असताना दुसऱ्या मोटारसायकल क्र. एमएच २६- १९१६ ने २९ फेब्रुवारी रोजी जोराची धडक दिली. यात एक शिक्षक जखमी तर त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. डोंगरकडा परिसरातील वरुड ग्रामपंचायतीअंतर्गत चिंचवाडी येथे मागील बऱ्याच दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चिंचवाडी येथील शिक्षक मुंगाजी खरवडे व त्यांची मुलगी आश्विनी मुंगाजी खरवडे (वय १७) हे दोघेही पाणी आणण्यासाठी मोटारसायकलवरून जाताना नांदेडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकल क्र. एमएच २६- १९१६ चीे धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना नांदेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान १ मार्च रोजी सकाळी पाचच्या सुमारास आश्विनीचा मृत्यू झाला. ती कै. बापूराव देशमुख महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. सदरील विद्यार्थिनीच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. डोंगरकडा फाट्यावरील व्यापाऱ्यांनी दुकाने एक तास बंद ठेवली होती. या विद्यार्थिनीवर तिच्या मूळ गावी जामगव्हाण येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास जमादार शंकर इंगोले करीत आहेत.