शेततळ्याच्या माध्यमातून घेतले तिहेरी उत्पादन
By Admin | Updated: December 18, 2014 00:38 IST2014-12-18T00:00:46+5:302014-12-18T00:38:00+5:30
विनोद नरसाळे , कोळगाव गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील तरूण शेतकरी मोहन पवार हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी खाजगी कंपनीतील नोकरीला सोडचिठ्ठी देऊन शेती व्यवसायात गरूडझेप घेतली आहे

शेततळ्याच्या माध्यमातून घेतले तिहेरी उत्पादन
विनोद नरसाळे , कोळगाव
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील तरूण शेतकरी मोहन पवार हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी खाजगी कंपनीतील नोकरीला सोडचिठ्ठी देऊन शेती व्यवसायात गरूडझेप घेतली आहे. केवळ आपल्यावर शेती व्यवसाय लादला जात असल्याची भावना बाजूला ठेवून शेतीचा अभ्यास करूनच त्यांनी या व्यवसायात पदार्पण केले आहे.
शेततळे करून दुष्काळावर मात केली आहे. शेततळ्याच्या माध्यमातून त्यांनी सात एकरात डाळींबाची बाग फुलविली आहे. आंतर पीक म्हणून कापूस उत्पादनातूनही लाखोचे उत्पन्न घेतले आहे. तर शेततळ्यातच पाच हजारांच्यावर मत्स्यबीज सोडलेले आहे. मत्स्य व्यवसायातूनही भरघोस उत्पादन पदार्पणातच घेतले आहे. त्यामुळे शेततळ्याबरोबरच पिकांकरीता त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही पवार यांनी शेततळ्याच्या माध्यमातून एकाच वेळी तिहेरी पीक घेतले आहे.
पदार्पनातच दुष्काळाचे सावट ओढावल्याने त्यांनी कृषी विभागाकडून राष्ट्रीय फलोत्पादन योजनेकडून शेततळे मंजूर करून घेतले. यामध्ये दोन कोटी २५ लाख लिटर पाण्याची साठवण करून डाळींब व कांदा यांचे उत्पादन घेतले.
या प्रमुख पिकांना जोड म्हणून त्यांनी शेततळ्यातून मत्स्यव्यवसायही सुरू केला आहे.
या करीता त्यांना वेळोवेळी कृषी सहायक आर.बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच शेती करीता असलेल्या विविध योजनाचा लाभ मिळाला असल्याचेही पवार यांनी सांगितले.