वृक्षलागवड करण्यात कागदोपत्री वृक्षलागवडीचा फार्स
By Admin | Updated: July 15, 2016 00:53 IST2016-07-15T00:27:35+5:302016-07-15T00:53:34+5:30
आशपाक पठाण/ बाळासाहेब जाधव/ सितम सोनवणे लातूर जिल्ह्यात ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लागवडीचे असलेले उद्दिष्ट एकाच दिवशी पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाचा खोटारडेपणा

वृक्षलागवड करण्यात कागदोपत्री वृक्षलागवडीचा फार्स
आशपाक पठाण/ बाळासाहेब जाधव/ सितम सोनवणे
लातूर जिल्ह्यात ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लागवडीचे असलेले उद्दिष्ट एकाच दिवशी पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाचा खोटारडेपणा ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे़ लातूर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत पण त्यात झाड नाही़ काही ठिकाणी जिथे जुने झाड आहे, त्याच्याच बाजूला झाड लावल्याची निशाणी करण्यात आली आहे़ लावलेले झाड दुसऱ्याच दिवशी जनावरे आणि शेळयामेंढ्यांनी खाऊन टाकल्याचे चित्रही काही भागात दिसून आले़ विशेष म्हणजे ग्रामीण भागात अनेक गावात नुसतीच कागदोपत्री नोंद करून उद्दिष्टपूर्तीचा आव आणण्यात आला आहे़
सामाजिक वनिकरण विभागाने राज्यभरात २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते़ त्यात लातूर जिल्ह्यासाठी ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले़ १ जुलै रोजी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विकास अधिकारी, लघु पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पशुवैद्यकीय विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग, निम्न तेरणा कालवा विभाग क्रमांक २, लातूर पाटबंधारे विभाग १, २, लघु सिंचन जलसंधारण विभाग, महसूल, सामाजिक वनिकरण, वन विभाग पोलिस अधीक्षक, क्रीडा अधिकारी, आरटीओ, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, एमआयडीसी, जिल्हा शैल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम लातूर, शासकीय महिला तंत्रनिकेतन, महानगरपालिका, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, देवणी जळकोट, चाकूर, शिरूर अनंतपाळ, जिल्हा कारागृह, जिल्हा न्यायालय, महावितरण, सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्यासह ४५ विभाग व संस्थांना हे उद्दिष्ट देण्यात आले होते़ यातील सर्वच विभागांनी वृक्षलागवड पूर्ण झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला खरा़ पण घाईघाईत लावलेले रोपटे दोन दिवसात कोठे गायब झाली हे सांगणेही आता संबंधित अधिकाऱ्यांना कठीण झाले आहे़ ‘लोकमत’ चमूने लातूर शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची पाहणी केली असता अनेक ठिकाणचे खड्डे रिकामेच असल्याचे आढळून आले़ त्याचबरोबर ग्रामीण भागातील प्रतिनिधींनीही वृक्ष लागवडीची पाहणी केली असता त्यांनाही हीच अवस्था दिसून आली आहे़ काही ठिकाणी वृक्ष लागवड झाली़ पण ती दुसऱ्याच दिवशी झाडे गायब झाली़ तर काही ठिकाणी वाळून गेली आहेत़ केवळ शासनाचा रेटा होता म्हणून अधिकाऱ्यांनी मोहीम राबविली़ मात्र लावलेले वृक्ष जगवायचे कसे याचे नियोजनच करण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे पंधरा दिवसातच या मोहिमेचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून आले आहे़ आता रिकाम्या खड्ड्यात वृक्ष लागवड होणार की खड्ड्यांचा खर्च पाण्यात जाणार हे मात्र न उलगडणारे कोडे आहे़