वाळू उपशाच्या नियमांचे राजरोसपणे उल्लंघन
By Admin | Updated: June 7, 2017 00:15 IST2017-06-07T00:13:58+5:302017-06-07T00:15:11+5:30
नांदेड: वाळू उपसा व वाहतुकीसाठी असलेल्या ६० नियमांचे राजरोसपणे उल्लंघन होत आहे़

वाळू उपशाच्या नियमांचे राजरोसपणे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यातील ८० हून अधिक वाळूघाटांच्या लिलावाची परवानगी विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिली असली तरी त्यातील ३० घाटांच्या लिलावातून १३ कोटी ३२ लाख ८१ हजारांचा महसूल प्रशासनास प्राप्त झाला आहे़ मात्र त्याचवेळी या वाळू उपसा व वाहतुकीसाठी असलेल्या ६० नियमांचे राजरोसपणे उल्लंघन होत आहे़
जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींचे ठराव आणि पर्यावरण विभागाच्या मान्यतेनंतर वाळू घाटांच्या लिलावासाठी जिल्ह्यात ई-लिलाव घेण्यात आले़ चारहून अधिक लिलाव घेवून आणि निर्धारित केलेल्या किंमतीत घट करूनही जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक वाळूघाटांना बोलीच लावली नाही़ लिलाव न झालेल्या या घाटावरून वाळू उपसा होत आहे की नाही हा संशोधनाचा विषय असला तरी लिलाव झालेल्या घाटावर मात्र नियमांचे उल्लंघन करीत वाळू उपसा केला जात आहे़ त्यातील एक नियम म्हणजे ज्या गटात वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली आहे त्याच गटातून आणि परवानगी दिलेल्या प्रमाणातच वाळूउपसा करावा हा नियम असला तरी जिल्ह्यातील बहुतांश वाळू ठेकेदारांकडून परवानगी मिळालेल्या अन् न मिळालेल्या ठिकाणाहूनही वाळू उपसा केला जात आहे़
जिल्ह्यातील ३० वाळू घाटांवर केवळ १ लाख ०४ हजार ४१४ ब्रास वाळू उपसा करण्यात परवानगी देण्यात आली आहे़ लिलावधारकाने संपूर्ण महसूल वर्षात परवानगी दिलेला वाळू उपसा करणे अपेक्षीत असताना परवानगी इतका वाळू उपसा तर लिलावधारक ८ ते १५ दिवसातच पूर्ण करतात़ त्यामुळे इतर काळातील उपसा हा अवैधच आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार ३६७ ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी बिलोली तालुक्यातील येसगी घाटावर दिली आहे़
त्याखालोखाल १० हजार १७७ ब्रास वाळू उपसण्यासाठी देगलूर तालुक्यातील शेवाळा येथील वाळू घाटावर परवानगी आहे़ हे आकडे कागदावरील असले तरी प्रत्यक्षात काय घडत आहे, हे महसूल, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी मागील अनेक वर्षापासून पाहत आहेत़ परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याचा प्रकार एखाद्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाते़ मात्र ठेकेदार मंत्रालयातून तो दंड माफ करून आणल्याचे अनेक प्रकार जिल्ह्यात घडले आहेत़
वाळू वाहतुकीकरीत बारकोडयुक्त वाहतूक पावत्याच्या आधारे केवळ १ व २ ब्रास वाळू वाहतूक करावी असा नियम आहे़ मात्र आजघडीला नांदेड जिल्ह्यातून आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यात १२ चाकी ट्रकमधून वाळू वाहतूक २४ तास सुरू आहे़ वाळू वाहतुकीची एसएमएसद्वारे महसूल विभागाला माहिती द्यावी त्यापेक्षा जास्त वाळू असेल तर लिलावधारक कारवाईस पात्र ठरणार आहे़
मात्र किती मेसेज महसूल विभागाला येतात हे अधिकारीच सांगू शकतील़ वाळू वाहतूक करताना नैसर्गिक संपत्ती व पर्यावरणास धोका होऊ नये असा नियम आहे, मात्र वाळू उपसा होतच आहे़