वाहतूक नव्हे, पोलिसच बेशिस्त!
By Admin | Updated: December 11, 2014 00:44 IST2014-12-11T00:07:13+5:302014-12-11T00:44:32+5:30
शिरीष शिंदे , बीड वाहतूक पोलीस अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करत नसल्याने त्यांना बळ मिळत आहे. त्यामुळचे बस स्थानक, भाजी मंडई व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर

वाहतूक नव्हे, पोलिसच बेशिस्त!
शिरीष शिंदे , बीड
वाहतूक पोलीस अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करत नसल्याने त्यांना बळ मिळत आहे. त्यामुळचे बस स्थानक, भाजी मंडई व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर या मुख्य ठिकाणी वाहने उभी करुन प्रवाशांचा भरणा केला जातोय. हाकेच्या अंतरावर असणारे वाहतूक पोलीस हा प्रकार पाहिला तरी त्याकडे उघडपणे डोळेझाक करत असल्याचे लोकमतने बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान समोर आले आहे.
शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गेवराई तालुक्याकडे जाणारी प्रवासी वाहने भरली जातात. एक ते दोन वाहने सोडली तर तेथे सर्व परवानाधारक रिक्षा थांबतात. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरच रिक्षा उभे करुन प्रवाशांचा भरणा केला जातोय. विशेष म्हणजे, रिक्षा बसण्यासाठी रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या प्रत्येक महिला, मुलींना कोठे जायचे आहे ? अशी विचारणा केली जाते. असे प्रकार वाहतूक पोलिसांच्या समोर घडतात मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची अथवा त्यांना दंड देण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे त्यांचे धाडस वाढत चालले असून कधी-कधी बस स्थानक परिसरातही प्रवासी भरले जातात.
स्काऊट भवन परिसर
बस स्थानक व वाहतूक पोलीस चौकीच्या जवळच असलेल्या स्काऊट भवन परिसरात अवैध वाहने उभी असतात. या वाहनांमध्ये बसस्थानक परिसरातून प्रवासी बोलावून आणले जातात. हा प्रकार वाहतूक पोलीस व परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहीत आहे, मात्र त्यांना कोणीही रोक लावत नाही. अवैध वाहने रस्त्याच्या बाजूला लावली जात असल्याने रस्ता आणखीनच रुंद होतो. अवैध वाहनांमुळे या भागात नेहमीच वाहन कोंडी होते. या भागात वाहन कोंडी झाली नसेल, असा एखादा अपवादात्मक दिवस असेल. सदरील परिसरात दवाखाना, बँक व पुढील बाजूस भाजी मंडई परिसर आहे. त्यामुळे दिवसभरात या रस्त्यावरुन दुचाकी व चार चाकी वाहनांची नेहमीच ये-जा असते. मात्र रस्ता अवैध वाहनांनी व्यापला गेला असल्याने नागरिकांना वाहन कोंडीचा सामना करावा लागतो. पोलिसांच्या नाकासमोर अवैध प्रवासी वाहनधारक प्रवाशांचा भरणा करतात मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास ते धजावत नाहीत. या प्रकाराला काय म्हणावे, हेच पोलिसांचे कर्तव्य आहे काय ? अशीच प्रश्न नागरिकांच्या मनात उमटतात.
भाजी मंडई परिसर
बस स्थानकपासून जवळच असलेल्या भाजी मंडई परिसरात अवैध वाहने उभी असतात. या भागातील रस्ता केवळ दहा फुटांचा आहे मात्र येथेही वाहनकोंडीचाच प्रकार कायम घडतो. भाजी मंडईच्या प्रमुख चौकातच वाहतूक पोलीस उभे असतात. पत्रकार भवनाच्या पुढील बाजूस असणाऱ्या भागाकडे पोलीस कधी फिरकतात की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. अवैध वाहने उभी असल्याने दहा फुटांचा रस्ता पाच फुट होतो. मोठे वाहन आले तर मग वाहन कोंडी होणार हे गणितच ठरलेले आहे. दुचाकीधारकांना तर या भागातून जाणे म्हणजे डोक्याला ताप करुन घेणेच आहे.४
अवैध वाहतुकीला पोलिसांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा रंगू लागली आहे़
४वाहतूक व्यवस्थापनावर कमी आणि महिन्याकाठी ‘वसुली’वर भर असल्याचे सांगितले जाते़
४त्यासाठी मर्जीतील कर्मचाऱ्याकडे जबाबदारी सोपविली आहे़
४जीप, रिक्षा, टमटम या वाहन चालकांकडून वसुलीसाठी रेट ठरलेला आहे़