बदल्यांचा मुहूर्त निघाला, पण संभ्रम कायम !
By Admin | Updated: May 13, 2015 00:27 IST2015-05-13T00:17:19+5:302015-05-13T00:27:08+5:30
भालचंद्र येडवे ,लातूर जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत विविध प्रकारचे वारे वाहू लागले होते़ पण विभागीय आयुक्तांनी गतवर्षीच्याच बदल्यांच्या धोरणांची

बदल्यांचा मुहूर्त निघाला, पण संभ्रम कायम !
भालचंद्र येडवे ,लातूर
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत विविध प्रकारचे वारे वाहू लागले होते़ पण विभागीय आयुक्तांनी गतवर्षीच्याच बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले आहे़ त्यानुसार लातूर जिल्हा परिषदेने २१ मे हा जरी मुर्हूत काढला असला तरी १३ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयाबाबत उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याबाबत निर्णय दिल्याने शिक्षण विभाग नेमक्या कोणत्या धोरणानुसार बदल्या करावयाच्या याबाबत संभ्रमात आहे़
सर्वसाधारण बदल्या २०१५ बाबत विविध संवर्गातून गतवर्षीच्याच शासनादेशानुसार अर्ज मागविले आहेत़ औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग ३) व गट ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी १५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसारच करावी, असे निर्देश सीईओंनी दिले आहेत़ उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कारवाई काटेकोरपणे पालन करुन पूर्ण करावी़ त्याबाबतची संपूर्ण माहिती ५ जून २०१५ पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयांकडे सादर करावे, असेही आयुक्तांनी पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे़
२१ मे २०१५ ते २८ मे २०१५ या कालावधीत विविध संवर्गातील सर्वसाधारण बदल्या केल्या जाणार आहेत़तालुकास्तरीय बदल्यांमध्ये २७ मे रोजी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, प्राथमिक पदवीधर व माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक यांचे तर २८ मे रोजी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, परिचर, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक आदी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या होणार आहेत़ परिणामी, बदल्यांच्या अंमलबजावणीत नेमकी कोणती भूमिका अंमलात आणायची याबाबत शिक्षण विभाग अद्यापही संभ्रमात आहे़