मंगळवारपासून सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST2021-06-28T04:04:46+5:302021-06-28T04:04:46+5:30

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे, शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुन्हा अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात ...

Transactions only from Tuesday from 7 am to 4 pm | मंगळवारपासून सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच व्यवहार

मंगळवारपासून सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच व्यवहार

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे, शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुन्हा अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात आला आहे. याबाबत सोमवार, २८ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होईल. मंगळवारपासून जिल्ह्यात आणि शहरात शासनाच्या आदेशानुसार तिसऱ्या स्तरातील नियम लागू होती, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. मंगळवारपासून सर्व आस्थापनांना दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या जातील. शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल. इतर दिवशी ४ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता संचार व जमावबंदी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शनिवार, रविवार दिवसभर संचारबंदी

दर आठवड्यातील शनिवार, रविवार पूर्णत: लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असेल. सोमवार ते शुक्रवार या दिवसांतच सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यापारी बाजारपेठा खुल्या राहतील. उद्योगांना यातून वगळण्यात येणार आहे.

जळगांवसह सर्व जिल्ह्यांच्या सीमांवर तपासणी

डेल्टा प्लसची लागण झालेला रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळला असून, जळगांवकडून जिल्ह्याकडे येणाऱ्या सर्व सीमांवर वाहनांच्या कडक तपासणीच्या अनुषंगाने अ‍ँटिजन, आरटीपीसीआर करण्यात येत आहे, तसेच इतर जिल्ह्यांतून औरंगाबादकडे येणाऱ्या आंतरजिल्हा सीमांवरही वाहन, प्रवाशांची तपासणीचा निर्णय सोमवारी होणार आहे.

चौकट...

व्यापाऱ्यांनी शासनाला बोलावे

व्यापाऱ्यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे, परंतु जिल्हा तिसऱ्या स्तरात आणून सर्व निर्बंध लागू करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शासनाला भेटून निर्बंध शिथिल करण्याबाबत मागणी करावी, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

चौकट...

सिनेमागृह, नाट्यगृह सुरू ठेवण्याचा विचार

२१ दिवसांपूवी शहर पहिल्या टप्प्यात आले होते. त्यामुळे सर्व निर्बंध हटविल्याने सिनेमागृह, नाट्यगृहे, मॉल्स सुरू झाले होते. आता पुन्हा निर्बंध येणार असल्यामुळे सोमवारी प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह, नाट्यगृह सुरू ठेवण्याबाबत विचार करण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तविली, तसेच मॉल्सबाबतही सर्वानुमते निर्णय होईल. हॉटेल्समध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत डायनिंग सुविधा ५० टक्के क्षमतेत असणार आहे. त्यानंतर, पार्सल सुविधेला परवानगी असणार आहे. शनिवार, रविवार हॉटेल्स पूर्णत: बंद असतील.

Web Title: Transactions only from Tuesday from 7 am to 4 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.