दुष्काळात नेत्यांचे पर्यटन; अभिनेत्यांची मदत
By Admin | Updated: September 4, 2015 00:32 IST2015-09-04T00:32:51+5:302015-09-04T00:32:51+5:30
लातूर : लातूरसह मराठवाडा दुष्काळाच्या खाईत सापडला असून, दुष्काळाची दाहकता समजून घेण्यासाठी विरोधक व सत्ताधारी पक्षांतील नेत्यांचे दौरे मराठवाड्यात वाढले आहेत

दुष्काळात नेत्यांचे पर्यटन; अभिनेत्यांची मदत
लातूर : लातूरसह मराठवाडा दुष्काळाच्या खाईत सापडला असून, दुष्काळाची दाहकता समजून घेण्यासाठी विरोधक व सत्ताधारी पक्षांतील नेत्यांचे दौरे मराठवाड्यात वाढले आहेत. दुष्काळी पाहणी दौरे पर्यटने होऊ नयेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दुष्काळाबाबत सहानुभूती कमी आणि राजकारणच जास्त दिसत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. ‘लोकमत’ने सर्वेक्षणाद्वारे शेतकऱ्यांची मते जाणून घेतली असता ५९ टक्के शेतकऱ्यांनी दुष्काळाची मदत मिळणे कठीण असल्याचे मत नोंदविले आहे.
पावसाअभावी यंदा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. चारा-पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, रोजगारही उपलब्ध नाही. या दुष्काळाची तीव्रता जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात केंद्रीय पथक येऊन गेले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दौरा केला. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनीही दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्याची पाहणी केली. महसूल मंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री पंकजा मुंडे आणि परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील शंभर शेतकऱ्यांचा सर्वे प्रश्नावलीद्वारे करण्यात आला. राजकीय नेत्यांच्या पाहणी दौऱ्याचे पर्यटन होऊ नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. शिवाय, पाहणी दौरे केले असले तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळेल की नाही, याबाबत ५९ टक्के शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली असून, केवळ ४१ टक्के शेतकऱ्यांनी मदत मिळेल, यावर विश्वास व्यक्त केला आहे.
दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यात सत्ताधारी व विरोधकांकडून वेगवेगळी विधाने केल्यामुळे सहानुभूतीपेक्षा राजकारणच या नेत्यांकडून होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना थेट अनुदान रुपाने मदत करणे आवश्यक आहे. तरच शेतकरी दुष्काळाला सामोरे जाऊन उभा टाकेल, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. काँग्रेसने दीर्घकाळ सत्ता भोगली. त्यांनी पाण्याचा संचय करण्यासाठी कोणतेही निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे आज दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, असे सत्ताधारी नेत्यांचे वक्तव्य आहे. तर गेल्या वर्षभरात शासनाने उपाययोजना केल्या नाहीत. शिवाय, दुष्काळाला सामोरे जात असलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केली नाही. हे सरकारच शेतकरी विरोधी असल्याचा सूर विरोधकांनी आवळला आहे. यात दोघांकडूनही सहानुभूतीपेक्षा राजकारण होत असल्याचे मत सर्वेक्षणामध्ये शेतकऱ्यांनी नोंदविले आहे. मत-मतांतरे करण्यापेक्षा थेट मदत करण्याची गरज असल्याची भावनाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह विरोधी नेते लातुरात येऊन गेले. नेते येण्यापूर्वी केंद्रीय पथकही येऊन गेले. मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट एकमेकांवर पलटवार करण्यातच हे नेते दौऱ्यावर येत असल्याचे दिसते, असे खरोळ्याचे शेतकरी संजय ढाले म्हणाले.
खरीप हंगाम पूर्ण गेला आहे. आता परतीचा पाऊस पडला, तरी रबीचा हंगाम पदरी पडेल, याची शाश्वती नाही. नेत्यांचे मात्र दौरेच होत आहेत. त्यांच्या भाषणाशिवाय आम्हाला अद्याप तरी काही मिळाले नाही. बरेचजण येऊन गेले. काही न करताच निघून गेले, असे पळशी येथील शेतकरी भरत जाधव म्हणाले.
दुष्काळामुळे शेतकरी होरपळत आहे. राजकीय नेत्यांकडून पीक परिस्थितीची पाहणी होत आहे. शरद पवार आले, नारायण राणेही येऊन गेले. मुख्यमंत्री कालच आले होते. मंत्री तर नेहमीच येताहेत. परंतु, शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना अद्याप हाती घेतल्या नाहीत. एकमेकांवर टीका करून ते जात आहेत. त्यांचे हे राजकारणच आहे, असे शिऊरचे शेतकरी बळवंत सूर्यवंशी म्हणाले.
गेल्या चार वर्षांपासून पाऊस नाही. त्यामुळे शेतात पिकत नाही. शासनाकडून कर्जमाफी नाही आणि नवीन कर्जाचीही योजना नाही. खत, बी-बियाणांचा खर्च वाया जातोय. परंतु, सरकार मात्र काहीच करीत नाही, असे बिटरगाव येथील शेतकरी केशव मनोहर दणदणे यांनी सांगितले.