तुरीमुळे शेतकरी झाले बेजार !
By Admin | Updated: February 4, 2017 23:41 IST2017-02-04T23:39:42+5:302017-02-04T23:41:25+5:30
लातूर : हमीभावावरून लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचा सौदा तीन दिवसांपासून बंद आहे़

तुरीमुळे शेतकरी झाले बेजार !
लातूर : हमीभावावरून लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचा सौदा तीन दिवसांपासून बंद आहे़ दरम्यान, नाफेडच्या हमीभाव केंद्रावरही पुरेशी यंत्रणा नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ त्यात ३० टक्के शेतकऱ्यांना या खरेदी केंद्रावर आर्द्रता जास्त असल्याचे सांगून परत पाठविण्यात येत आहे़ शिवाय, शेतकऱ्यांना बाजार समितीतही त्याची विक्री करता येईनाशी झाली आहे़
शासनाने तुरीला ५ हजार ५० रूपये हमीभाव जाहीर केला आहे़ मात्र या दराप्रमाणे तुरीची खरेदी केली जात नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली होती़ दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्हा उपनिबंधकांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीचा सौदा बाजार समितीतील आडते, खरेदीदारांनी करू नयेत, असे बाजार समित्यांना बजावले़ त्यामुळे गुरूवारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते व खरेदीदारांनी तूर वगळता अन्य शेतमालाचा सौदा पुकारला़ आम्हाला हमी भावाप्रमाणे तूर खरेदी करणे परवडत नसल्याची भूमिका घेत शुक्रवारी आडते व खरेदीदारांनी बाजारपेठच बंद ठेवली़ शनिवारी आडत बाजार सुरू झाला असला तरी तुरीचा सौदा मात्र पुकारण्यात आला नाही़ सध्या बाजार समितीत तुरीची दररोज १० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडकडे तूर विक्री करावी लागत आहे़ (अधिक वृत्त/हॅलो २ वर)