‘निर्मल ग्राम’ चे तीन कोटी पडून
By Admin | Updated: June 18, 2014 01:45 IST2014-06-17T22:54:39+5:302014-06-18T01:45:55+5:30
गजानन वानखडे , जालना स्वच्छतेकडून समृध्दीकडे असा मंत्र देत घर तेथे शौचालय बांधण्याचा निर्धार शासनाने केला आहे.

‘निर्मल ग्राम’ चे तीन कोटी पडून
गजानन वानखडे , जालना
स्वच्छतेकडून समृध्दीकडे असा मंत्र देत घर तेथे शौचालय बांधण्याचा निर्धार शासनाने केला आहे. मात्र, ग्रामीण भागात निर्मलग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छतागृह बांधकामासाठी जिल्ह्याला ६ कोटी ४३ लाख ४४ हजार आठशे रूपये इतका निधी मिळाला त्यापैकी ४ कोटी २२ लाख ७३ हजार रूपये स्वच्छतागृह बांधण्यावर खर्च झाला खरा, परंतु उर्वरीत ३ कोटी रूपये अजूनही खर्चाविना पडून आहेत.
आतापर्यंत जालना, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन या तालुक्यात ४ कोटी २२ लाख ७३ हजार निधी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. परंतु पावसाळा जवळ आला तरी राहिलेला ३ कोटींचा निधी पंचायत विभागाकडे अखर्चित पडून आहे.
२०१३-१४ वर्षासाठी ग्रामीण भागात १३९८८ एवढे स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी शासनाने ६ कोटी ४३ लाखांची तरतूद केली. त्यातून १३१८७ स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले. यात जालना १९०७, अंबड येथे १८३६, घनसावंगी २०४७, परतूर, २२३६, मंठा, १८९९, भोकरदन येथे ३७५४ एवढे स्वच्छतागृह बांधण्यात आले. उर्वरित कामांसंदर्भात दुर्लक्ष करण्यात आले. अजूनही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावात प्रवेश करताना नाकाला रूमाल लावून प्रवेश करावा लागतो. तसेच दुर्गंधीमुळे आणि घाणीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामीण भाग दुर्गंधीमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. निर्मल भारत अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह लाभ योजना अस्तिवात आणली. अनेक गावात रंगीत दूरचित्रवाणी संच आहेत. मात्र, स्वच्छतागृहे नाहीत.
या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा मोहीम राबवून वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीसाठी काटेकोरपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पंचायत विभाग पुढाकार घेणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी.केंद्र यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सीईओंची परीक्षा
गेल्या काही महिन्यांपूर्वी नव्याने रुजू झालेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निर्मल ग्राम योजनेसह अन्य योजनांतर्गत पडून असलेल्या निधीसंदर्भात माहिती कळाली तेव्हा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यातून वेगवेगळ्या योजनांसह रखडलेल्या कामांसदर्भात आढावा घेतला.