पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे तीन तेरा
By Admin | Updated: May 14, 2014 23:58 IST2014-05-14T23:17:01+5:302014-05-14T23:58:51+5:30
जालना: नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत कसलेही वेळापत्रक तयार केले नाही. त्यामुळे जुन्या व नवीन जालन्यातील वसाहतींमधून वेळी-अवेळी केव्हाही पाणीपुरवठा होत आहे.

पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे तीन तेरा
जालना: नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत कसलेही वेळापत्रक तयार केले नाही. त्यामुळे जुन्या व नवीन जालन्यातील वसाहतींमधून वेळी-अवेळी केव्हाही पाणीपुरवठा होत असून, काही भागात आठ दिवसाआड तर काही भागात चक्क १५- १५ दिवसाआड पुरवठा होत असल्याने पाणी असून शहरवासीयांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना शहराला घाणेवाडी व जायकवाडी- जालना योजनेतून पाणीपुरवठा होतो. घाणेवाडीतून नवीन जालन्याला तर जायकवाडी योजनेतून जुन्या जालन्याला पाणीपुरवठा होतो आहे. या दोन्हीही स्त्रोत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. दुर्दैवाने पालिका प्रशासनाकडून तेथून पाणी आणण्यासह ते वितरीत करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न होत नाहीत. मुळात शहरात पाणीपुरवठ्याबाबत पालिकेने कुठलेही नियोजन केले नाही. पालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच मुख्याधिकार्यांसह सभापती या संदर्भात कमालीचे मौन बाळगून आहेत. परिणामी, संपूर्ण शहरवासीय पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. शहरातील विविध भागांना पाणी सोडण्याचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कोणत्याही भागाला केव्हाही पाणीपुरवठा केला जातो. अगदी मध्यरात्रीसुद्धा पाणी सोडले जात आहे. त्याप्रमाणे काही भागात आठ दिवसाआड तर काही भागात पंधरा-पंधरा दिवसांनी पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी जायकवाडी योजनेमुळे गेल्यावर्षीएवढी भीषण टंचाई जाणवत नाही. मात्र पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. जुन्या जालना भागात मागील १० ते १५ दिवसांपासून निर्जळी होती. बुधवारी या भागात पाणीपुरवठा झाला. नवीन जालना भागात काही ठिकाणी दहा-दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तेथील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत किंवा पाणी टँकरव्दारे खरेदी करत आहेत. पाणी सोडताना मोठ्या प्रमाणात दुजाभाव करण्यात येत असल्याचे चित्र काही भागात पहावयास मिळत आहे. शहरातील काही ठिकाणी अर्धा तास तर काही ठिकाणी दोन-दोन तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे कमीवेळ पाणी आलेल्या भागातील नागरिकांना पिण्याइतकेही पाणी मिळत नाही तर जास्त वेळ पाणी आलेल्या भागात नागरिकांना मुबलक पाणी मिळून ते वायाही जात असल्याचे चित्र दिसते. त्यापाण्यातून वाहनेही धुतल्या जात आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. (वार्ताहर) वेळापत्रक नसल्याची कबुली पालिकेकडे पाणीपुरवठ्यासंबधी वेळापत्रक नसल्याचे पाणी पुरवठा विभागातील अधिकार्यांनीही कबूल केले आहे. एकदा वेळापत्रक तयार केले होते. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा करताना भारनियमनाचा मोठा अडथळा येत होता. त्यामुळे भारनियमनाच्या वेळापत्रकाप्रमाणे विविध भागात आठ दिवसाआड ठराविक वेळेत पाणीपुरवठा केला जात असल्याचे पालिकेच्य पाणी पुरवठा विभागातील अधिकार्यांनी सांगितले.