अपघातात तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: October 29, 2015 00:20 IST2015-10-28T23:57:02+5:302015-10-29T00:20:13+5:30
कळंब : कळंब-येरमाळा रस्त्यावरील हासेगाव (केज) गावानजीक कँटर (मोठा टेम्पो) व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला.

अपघातात तिघांचा मृत्यू
कळंब : कळंब-येरमाळा रस्त्यावरील हासेगाव (केज) गावानजीक कँटर (मोठा टेम्पो) व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंब-येरमाळा रस्त्यावरील पर्याय संस्था ते हासेगाव (केज) पाटीदरम्यान येरमाळ्याहून अंबाजोगाईकडे निघालेल्या कँटर (क्र. एमएच ४४/ ६६९०) ची कळंबहून घोडकीकडे निघालेल्या दुचाकी (क्र. एमएच २४/ बी ९५०७) ला समोरासमोर जोराची धडक बसली. यात दुचाकीवरील बंडू बंकट तरटे (वय ३०) आणि विश्वनाथ दत्तू माने (वय ४०) (दोघेही रा. घोडकी, ता. वाशी) हे जागीच ठार झाले. तर तानाजी नामदेव तरटे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
घोडकी येथील हे तिघेही कळंब येथे सोयाबीन विक्रीसाठी आले होते, असे सांगण्यात येत आहे. मयत बंडू तरटे व तानाजी तरटे हे चुलत भाऊ तर विश्वनाथ माने हे त्यांचे नातेवाईक होते. या घटनेतील कँटरचालक फरार असून, कळंब पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर)