तीन दिवसात उडीदाचा दर चार हजारांनी कोसळले !
By Admin | Updated: August 29, 2016 00:56 IST2016-08-29T00:45:35+5:302016-08-29T00:56:04+5:30
परंडा/आवारपिंपरी : पावसाळ्याचे जवळपास तीन महिने सरत आले आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील प्रकल्प भरतील असा एकही दमदार पाऊस झालेला नाही.

तीन दिवसात उडीदाचा दर चार हजारांनी कोसळले !
परंडा/आवारपिंपरी : पावसाळ्याचे जवळपास तीन महिने सरत आले आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील प्रकल्प भरतील असा एकही दमदार पाऊस झालेला नाही. मात्र, अधूनमधून झालेल्या रिमझीम स्वरूपाच्या पावसावर विशेषत: उडीद, मुग ही पिके तरली. सध्या आवारपिंपरीसह परिसरात या पिकांच्या राशींची लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी राशी उरकून उडीद आडतीवर नेताच दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. तीन दिवसात तब्बल चार हजार रूपयांनी दर कोसळले. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
तीन ते चार वर्षांपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्याच्या काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पेरणी उरकली. प्रकल्प भरतील असा एकाही दमदार पाऊस झाला नसला तरी अधूनमधून झालेल्या रिमझीम स्वरूपाच्या पावसामुळे उडीद, मूग ही पिके तगली आहेत. असे असले तरी मागील वीस ते बावीस दिवसांपासून पाऊस नसल्याने या पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. दरम्यान, परिसरात सध्या या पिकांच्या काढणीची लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा, म्हणून तातडीने राशी उरकून उडीद आडतीवर नेला. मात्र, उडीद आडतीवर दाखल होताच दरामध्ये प्रचंड घसरण होवू लागली आहे. काही शेतकऱ्यांनी बुधवारी बार्शी येथील आडतीवर उडीद दिला असता ८ हजार ७०० ते ९ हजारापर्यंत दर मिळाला. दुसऱ्या दिवशी मात्र, तब्बल एक ते दीड हजाराने दरात घसरण झाली. शुक्रवारी तर उडीदाला प्रतिक्विंटल सात ते साडेसात हजार रूपये भाव मिळाला. आणि शनिवारी पुन्हा दरामध्ये मोठी घसरण झाली. प्रतिक्वंटल ५ हजार ते ५ हजार ९०० रूपये घेवून घरचा रस्ता धरावा लागत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)