हजार शाळा संरक्षण भिंतीविना !

By Admin | Updated: July 5, 2014 00:42 IST2014-07-05T00:19:26+5:302014-07-05T00:42:12+5:30

संजय कुलकर्णी, जालना जिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांना संरक्षण भिंतीच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली

Thousands of schools are without protection walls! | हजार शाळा संरक्षण भिंतीविना !

हजार शाळा संरक्षण भिंतीविना !

संजय कुलकर्णी, जालना
जिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांना संरक्षण भिंतीच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली असून, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक या सरकारी शाळांच्या जागा अतिक्रमणांनी व्यापू लागल्या आहेत. तर काही शाळांच्या जागेचा वापर खाजगी साहित्य टाकण्यासाठी होऊ लागला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जन कार्यावर त्याचा विपरित होतो आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात काही ठिकाणी या प्रकारामुळेच शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांचे या अतिक्रमणकर्त्यांबरोबर वाद-विवादाचेही प्रसंग घडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १५१४ शाळा आहेत. यात १४८२ प्राथमिक तर ३२ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांनी ठिक ठिकाणी मोठ्या जागा मिळाल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागात शाळांचा आवार मोठा आहे. ग्रामपंचायतींनी मोठ्या उदात्त हेतून तसेच भविष्यातील विस्तार ओळखून शाळांकरिता जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र काही शाळांची इमारती मर्यादित जागेवर उभ्या आहेत.त्यामुळे त्या त्या ठिकाणी शाळांच्या विस्तारीकरणात मोठ मोठे अडथळे उदभवू लागले आहेत. विशेषत: वर्ग खोल्यांचा प्रश्न भेडसावतोय आहे. त्यातच आता शाळेभोवती संरक्षक भिंतीच नसल्यामुळे काही शाळांच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटली आहेत. मोकळ्या जागेचा वापर कडबा टाकणे, जनावरे बांधणे, शेतीचा माल टाकणे इत्यादी कामांसाठी होत आहे. शाळेची जागा वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. बहुतांश शाळा मुख्य रस्त्यावर आहेत. यामुळे धोका आहे.
पक्क्या पण तुटलेल्या आवार भिंती
पक्क्या पण तुटलेल्या आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ५६ एवढी आहे. यापैकी बऱ्याच शाळांच्या संरक्षण भिंतींच्या दुरूस्तीचे काम या ना त्या कारणाने रेंगाळले. तुटलेल्या संरक्षण भिंतींमुळे येथील सुरक्षितता धोक्यात आली आहे. दुरूस्तीच्या कामांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे देण्यात आल्याचे काही मुख्याध्यापकांकडून सांगण्यात येते.
तारेचा कुंपणाचा आधार
१२२ शाळांना तारेचे कुंपण करून शाळेचे संरक्षण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तारेचे कुंपणही अनेक ठिकाणी निघालेले आहे. त्यामुळे जनावरे तेथे जात आहेत. अशा शाळांच्या ठिकाणी नव्याने संरक्षण भिंतीचे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
काही शाळांना झाडांचे कुंपण
२६८ शाळांना झाडांचे कुंपण करण्यात आले आहे. अशा शाळांमधील शिक्षकांच्या प्रयत्नाने शाळेच्या जागेभोवती झाडे लावून संरक्षण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अशा ठिकाणची काही झाडेही उन्मळून पडलेली आहेत.
आवार भिंत नसलेल्या शाळा
आवार भिंती नसलेल्या शाळांची संख्या ६३९ एवढी आहे. यापैकी काही शाळा वर्दळीच्या रस्त्यांवर आहेत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थी पळत सुटतात, त्यामुळे अशा शाळांभोवती आवार भिंतीची गरज आहेअ.
अर्धवट आवार भिंती
अर्धवट आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ९६ एवढी आहे. अशा शाळांच्या आवार भिंतीचे काम सुरू झाले होते. मात्र ते काही कारणाने बंद पडले. काही शाळांचे अर्धवट काम नंतर वर्षानुवर्षे पूर्ण झालेच नाही. त्यामुळे अशा शाळांभोवतीच्या आवार भिंतीचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.
केवळ २ शाळांचे काम सुरू
जिल्ह्यात केवळ २ शाळांच्या आवार भिंतीचे काम सुरू आहे. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीची कामे ज्याप्रमाणे हाती घेण्यात आली, त्याप्रमाणे शाळांच्या आवार भिंतीची कामेही करावीत, अशी अपेक्षा ग्रामीण भागात पालकांमधूनही व्यक्त केली जात आहे.
निधीची गरज
जिल्ह्यात पक्की आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ३२९ एवढी आहे. एकूण शाळांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. ज्या ठिकाणी पक्क्या आवार भिंती आहेत, तेथील शाळांची रंगरंगोटीही बऱ्यापैकी झालेली आहे. यापैकी बहुतांश शाळांना प्रवेशद्वार असून ते शाळेच्या वेळेतच उघडे असते.
याबाबत जि.प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती वर्षाताई देशमुख म्हणाल्या की, १००९ शाळांना संरक्षण भिंती नाहीत. या शाळांच्या संरक्षण भिंतीच्या कामांसाठी ७० ते ८० कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे हे एकाचवेळी होणारे काम नाही. मात्र नाविन्यपूर्ण योजनेतून या कामासाठी निधी गरजेचा आहे

Web Title: Thousands of schools are without protection walls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.