‘त्या’ मालमत्ता हस्तगत करणार
By Admin | Updated: December 24, 2015 00:03 IST2015-12-23T23:54:56+5:302015-12-24T00:03:45+5:30
औरंंंगाबाद : जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या किती मालमत्ता आहेत, या बद्दल प्रशासन अनभिज्ञ आहे.

‘त्या’ मालमत्ता हस्तगत करणार
औरंंंगाबाद : जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या किती मालमत्ता आहेत, या बद्दल प्रशासन अनभिज्ञ आहे. अनेक मालमत्तांचे कागदपत्रेदेखील जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नाहीत, अशी खंत सदस्यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जि. प. च्या अतिक्रमित मालमत्ता हस्तगत करणे व मालमत्तांची कागदपत्रे जमा करण्यावर आम्ही भर दिला आहे, असे निवेदन केले.
जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू झाली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दिनकर पवार, बांधकाम सभापती संतोष जाधव, शिक्षण सभापती विनोद तांबे, समाजकल्याण सभापती शीला चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांची उपस्थिती होती. आजच्या बैठकीत जि. प. च्या मालमत्तांचा विषय गाजला. सदस्य रामदास पालोदकर यांनी मुद्दा मांडला की, सिल्लोड तालुक्यातील खेडी येथे शाळेच्या जागेवर तेथील एका शेतकऱ्याने दावा केला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले, अशा प्रकारच्या किती मालमत्तांची प्रकरणे न्यायालयात आहेत. किती प्रकरणे निकाली निघाली आहेत, अशा प्रश्नांची सरबत्ती करत पालोदकर यांनी सभागृहाला धारेवर धरले.
पालोदकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल खुलासा करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा म्हणाले की, जिल्ह्यात १ हजार २० मालमत्तांची कागदपत्रे हस्तगत करण्यात आलेली आहेत. १२६० मालमत्तांची कागदपत्रेही हस्तगत करू.
दिल्ली गेट येथील जि.प.च्या जागेवर असलेल्या पेट्रोलपंपाबाबतची केस पुन्हा न्यायालयात ‘रिओपन’ करणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर काय कारवाई केली, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला तेव्हा शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात ३१ अनधिकृत शाळा होत्या त्यापैकी २२ शाळा बंद झाल्या असून ४ शाळांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातील एक शाळा ३० एप्रिल २०१६ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.