‘त्या’ शाळांना चपराक
By Admin | Updated: June 25, 2016 00:41 IST2016-06-25T00:12:35+5:302016-06-25T00:41:03+5:30
औरंगाबाद : नैसर्गिक वाढीनुसार वरचे वर्ग सुरू करताना २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील अटींकडे काही शाळांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

‘त्या’ शाळांना चपराक
औरंगाबाद : नैसर्गिक वाढीनुसार वरचे वर्ग सुरू करताना २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील अटींकडे काही शाळांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण संचालक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत. यापुढे जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच कोणत्याही खाजगी (विविध माध्यमांच्या) शाळांनी इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करताना शासन निर्णयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, याकडे प्रभारी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे यांनी एका परिपत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे.
अनेक जि. प. तसेच काही खाजगी (विविध माध्यमांच्या) शाळांनी शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करून सरसकट इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करीत आहेत. यासंबंधीची तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल आणि विनाअनुदानित शाळा कृती समितीने प्रभारी शिक्षण उपसंचालक तुपे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन तुपे यांनी विभागातील सर्व जि. प. तसेच खाजगी शाळांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे एक परिपत्रक जारी केले. परिपत्रकात नमूद केले आहे की, ज्या ठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत शाळा आहे, पण त्या शाळेपासून १ किलोमीटरच्या परिघामध्ये त्याच माध्यमाचा इयत्ता ५ वीचा वर्ग नसेल, तर अशा शाळांनी ५ वीचा वर्ग सुरू करावा. मात्र, ज्याठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत शाळा आहे. याशिवाय शाळेपासून १ किलोमीटर परिघामध्ये दुसऱ्या शाळेत इयत्ता ५ वीचा वर्गदेखील सुरू आहे. अशा शाळांमध्ये ५ वीचा वर्ग सुरू करता येणार नाही. याप्रमाणे ज्या शाळेमध्ये १ ली ते ७ वीपर्यंतचे वर्ग आहेत; पण शाळेपासून ३ किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये त्याच माध्यमाचा ८ वीचा वर्ग नाही. अशा शाळेत ८ वीचा वर्ग सुरू करता येईल. मात्र, अशा शाळांच्या ३ किलोमीटर अंतराच्या परिघात अन्य शाळांमध्ये त्याच माध्यमाचा ८ वीचा वर्ग सुरू असेल, तर अशा शाळेत ८ वीचा वर्ग सुरू करता येणार नाही. शासन निर्णयातील अटी व शर्र्तींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना सूचित करण्यात आले आहे.