‘त्या’ दांडीबहाद्दर बीएलओंना अभय
By Admin | Updated: July 6, 2014 00:35 IST2014-07-06T00:25:59+5:302014-07-06T00:35:37+5:30
औरंगाबाद : निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गैरहजर राहिले.

‘त्या’ दांडीबहाद्दर बीएलओंना अभय
औरंगाबाद : निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गैरहजर राहिले. त्यामुळे अनेक नागरिकांना मतदान केंद्रांवरुन नोंदणीशिवाय माघारी जावे लागले. मात्र, आठवडा उलटूनही जिल्हा प्रशासनाने गैरहजर बीएलओंवर कोणतीही कारवाई केलेली नाही. विशेष नोंदणी मोहिमेच्या दिवशी जिल्ह्यात नेमके किती बीएलओ गैरहजर होते याची साधी आकडेवारीही जमा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केलेले नाही.
मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने नावे वगळल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यभरात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर याविरोधात काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आयोगाने नंतर ही चूक सुधारण्यासाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ९ जून ते ३० जून या काळात मतदार नोंदणी मोहीम राबविली गेली. यादरम्यान २८ आणि २९ जून रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर बीएलओ उपस्थित राहतील असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही दिवस अनेक मतदार नोंदणीसाठी जवळच्या मतदान केंद्रांवर पोहोचले. लोकमतने दोन्ही दिवस शहरातील काही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तेव्हा शहरातील अनेक केंद्रांवर बीएलओ पोहोचलेच नसल्याचे दिसून आले. याबाबत छायाचित्रासह वृत्त प्रकाशित करण्यात आले.
त्यानंतर सर्व तहसील कार्यालयांकडून गैरहजर बीएलओंचा अहवाल मागविण्यात आला. मात्र, आता आठवडा उलटला तरी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही. निवडणूक शाखेकडे विचारणा केली असता आतापर्यंत केवळ एकाच तालुक्याचा अहवाल आला असून, उर्वरित ८ तालुक्यांनी कोणताही अहवाल सादर केलेला नसल्याचे सांगण्यात आले.
1आतापर्यंत औरंगाबाद तहसील कार्यालयाकडूनच बीएलओंच्या गैरहजेरीचा अहवाल आला आहे. त्यातही केवळ एकच बीएलओ गैरहजर होता, असे दाखविण्यात आले आहे. नोंदणी मोहिमेच्या दिवशी शहरातील ८०० पैकी अनेक केंद्रांवर बीएलओ उपस्थित नव्हते. तहसील कार्यालयाने सुमारे ३५ केंद्रांवर बीएलओ गैरहजर होते, असे सुरुवातीला सांगितले होते. मात्र, आता हा आकडा एकवर आला आहे.
2याविषयी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी अजब खुलासा केला. काही बीएलओ केंद्रांवर नसल्याचे दिसून आले. मात्र, नंतर क्रॉस चेक केले तेव्हा ते दुसरीकडे बसले होते, अशी माहिती समोर आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. बीएलओ केंद्र सोडून दुसरीकडे बसणार होते तर मग सर्व केंद्रांवर मतदार नोंदणी केली जाणार असल्याचे आधी का जाहीर केले. बीएलओंच्या गैरहजेरीमुळे त्या दिवशी माघारी जावे लागलेल्या नागरिकांचे काय, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
तहसीलची बनवाबनवी
1मतदार नोंदणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
2लवांडे यांनी काही केंद्रांना भेटी दिल्या तेव्हा त्यातही दोन केंद्रांवर बीएलओ गैरहजर आढळल्याचे दिसून आले. या बीएलओंवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मात्र, आता त्यातील एका बीएलओला हजर दाखविण्याचे काम तहसील कार्यालयाने केले आहे.
गैरहजर बीएलओंचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व तहसील कार्यालयांना दिले होते; पण आतापर्यंत एकाच तहसीलचा अहवाल आला आहे. उर्वरित तहसीलला अहवाल सादर करण्यासाठी दुसऱ्यांदा पत्र पाठविले आहे. अहवाल आल्यावरच कारवाई होऊ शकेल.
- शशिकांत हदगल, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी