गुंतवणूकधारक झिजवताहेत ठाण्याचे उंबरठे

By Admin | Updated: July 25, 2014 00:30 IST2014-07-24T23:34:30+5:302014-07-25T00:30:23+5:30

जालना: चार वर्षांत तिप्पट रकमेच्या आमिषास बळी पडलेल्या केबीसीतील हजारो गुंतवणूकधारकांनी आता कंपनीच्या कार्यालयापाठोपाठ पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे.

Things are shattered by the investor's losses | गुंतवणूकधारक झिजवताहेत ठाण्याचे उंबरठे

गुंतवणूकधारक झिजवताहेत ठाण्याचे उंबरठे

जालना: चार वर्षांत तिप्पट रकमेच्या आमिषास बळी पडलेल्या केबीसीतील हजारो गुंतवणूकधारकांनी आता कंपनीच्या कार्यालयापाठोपाठ पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे.
केबीसी मल्टीट्रेड या कंपनीत या जिल्ह्यातील किमान चार ते पाच हजार व्यक्तींनी गुंतवणूक केली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील गुंतवणूकधाकांची संख्या लक्षणीय आहे. जवळपास साडेतीन ते चार हजार ग्रामस्थांनी या तथाकथित कंपनीत गुंतवणूक केली असावी असा पोलिसांचा कयास आहे. घनसावंगी व अंबड या दोन तालुक्यात हे प्रमाण लक्षणीय आहे. घनसावंगी, अंबड तालुक्यातील गोंदी व परतूर तालुक्यातील आष्टी या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेकडो खेड्यांमधून एजंटांनी मोठा धुमाकूळ घातला होता. विशेषत: आकर्षक कमिशनचे आमिष दाखवून एजंट व पिग्मी कलेक्टरांच्या ताफ्यानिशी मोठ्या कुशलतेने कंपनीने योजनांचा प्रसार व प्रचार केला. जिल्ह्यात अन्यत्रही मोठ्या प्रमाणात एजंट नेमले. या सर्वांनी एकमेकांना विश्वास दाखवून चार वर्षांत तिप्पट रकमेचे आमिष दाखविले. अन्य योजनाही समोर केल्या. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर पाच हजारांपासून ते लाखापर्यंत गुंतवणूक करुन घेतली. दीड दोन महिन्यांपूर्वी पर्यंत या कंपनीने या गुंतवणूकधारकांना खिळवून ठेवले. एंजट व पिग्मी धारकांना जेव्हा व्यवहार कोलमडल्याचे लक्षात आले. तेंव्हा या दोघा घटकांनी काढता पाय घेतला. हळूहळू कार्यालये सुद्धा गुंडाळल्यानंतरच गुंतवणूकधारकांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
या जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागातील गुंतवणूकधारकांनी दीड दोन महिने या कंपनीचे उंबरठे झिजवून पैसे परत मिळावेत म्हणून प्रयत्न केले. परंतु त्यांना कोणीही दिलासा तर दिलाच नाही; उलट उर्मट उत्तरे दिली. त्यामुळे हबकून गेलेल्या गुंतवणूकधारकांनी वेगवेगळ्या दबावतंत्राचा वापर करीत स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. तोही निष्फळ ठरला. आता गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वदूर केबीसीने चुना लावल्याचे वृत्त कळाल्यापासून गुंतवणूकधार हळूहळू पोलिसांसमारे प्रकट होऊ लागले आहेत. आपलीही फसवणूक झाल्याच्या तक्रारी नोंदू लागल्या आहेत.
या जिल्ह्यात आतापर्यंत ७५ तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यातील एकूण गुंतवणुकीची रक्कम २० कोटींच्या जवळपास आहे. तक्रारकर्त्यांची संख्या वाढेल असा अंदाज असून, या जिल्ह्यातून जवळपास ५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. परंतु या संदर्भात अगदी खुलेआमपणे कोणीही अद्यापही बोलावयास तयार नाही. मात्र ज्यांनी काबाडकष्ट करीत मोठ्या उमेदीने गुंतवणूक केली ते आता पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडत समोर येऊ लागले आहेत.
पोलिसही हतबल
जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडे काही नागरिकांनी थेट तक्रारी केल्या. पैसे मिळवून देण्याची विनवणी केली. पोलिस अधीक्षकांनी या सर्व तक्रारींची दखल घेण्याकरिता स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागास निर्देश दिले. या विभागाने आता ही सर्व प्रकरणे गोळा करुन नाशिकच्या पोलिस आयुक्तांकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिस साशंक आहेत. त्यामुळे ते गुंतवणूकधारकांना कोणतीही उत्तरे देईनासे असे झाले आहेत.
(प्रतिनिधी)
माध्यमांची कार्यालयात तक्रारी
इलेक्ट्रॉनिक्स व प्रिंट मीडियाच्या कार्यालयांमधून दररोज किमान पाच व्यक्ती फसवणूक झाल्याच्या तक्रारी घेऊन दाखल होऊ लागले आहेत. आपण मोठ्या उमेदीने गुंतवणूक केली. व्याज घेतले. परंतु आता मुद्दलच मिळत नसल्याने करावे, काय असा सवाल करीत हे तक्रार करते डोळ्यात पाणी आणू लागले आहेत. आपल्या व्यथा मांडा, पैसे मिळवून द्या, अशी विनवणी करीत आहेत.
घनसावंगी, गोंदी व आष्टी या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत फसवणूकधारकांची संख्या मोठी आहे. या तिन्ही ठाण्यांत सर्वाधिक म्हणजे ४५ गुन्हे दाखल झाले आहेत. आणखीनही तेवढेच गुन्हे दाखल होतील, असा अंदाज आहे. अन्यत्रही आता तक्रार करते पुढे येऊ लागले आहेत. साहेब तक्रार नोंदवा, गुन्हा दाखल करा, जप्ती करा अन् कुठल्याही परिस्थितीत पैसे मिळवून द्या अशी विनवणी करीत गोरगरीब शेतकरी, निराधार पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसू लागले आहेत.

Web Title: Things are shattered by the investor's losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.