खताची टंचाई भासणार
By Admin | Updated: April 27, 2016 00:38 IST2016-04-27T00:07:48+5:302016-04-27T00:38:46+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद मागणीपेक्षा कमी साठा मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात खताची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खताची टंचाई भासणार
सुनील कच्छवे, औरंगाबाद
मागणीपेक्षा कमी साठा मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात खताची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी २ लाख ९३ हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदविली होती. परंतु शासनाकडून २ लाख २० हजार मेट्रिक टन इतक्याच खताचा साठा मंजूर झाला आहे.
हवामान खात्याने यंदा मान्सूनचे लवकर आगमन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खरिपाची पूर्व तयारीही सुरू झाली आहे. परंतु यंदा जिल्ह्यासाठी तुलनेने खताचा साठा कमी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा मागील वर्षीपेक्षा कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खताची मागणीही अधिक असणार आहे.
गतवर्षी जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र २ लाख ९५ हेक्टर होते. यावर्षी ते ४ लाख २५ हेक्टरपर्यंत जाण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे खताची वाढीव मागणी नोंदविण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात आधीच्या वर्षापेक्षाही कमी खताचा साठा मंजूर झाला आहे.
कृषी विभागाने या खरीप हंगामासाठी एकूण २ लाख ९३ हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदविली होती. त्या तुलनेत केवळ २ लाख २० हजार मेट्रिक टन खतच मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन्ही वर्षांमध्ये जिल्ह्यात २ लाख ३५ हजार मेट्रिक टन इतका खताचा साठा मंजूर झाला होता.
शासनाने तुलनेने सर्वात कमी संयुक्त खतांचा साठा मंजूर केला आहे. कृषी विभागाने संयुक्त खताच्या १ लाख १८ हजार मेट्रिक टन साठ्याची मागणी नोंदविली होती, पण त्या तुलनेत केवळ ६७ हजार मेट्रिक टन इतकाच खत मंजूर केला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून युरिया खताचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे कृषी विभागाने चालू वर्षासाठी युरिया खताची १ लाख १० हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदविली होती. प्रत्यक्षात १ लाख मेट्रिक टन युरिया मंजूर झाला आहे. इतर खतांचा साठाही मागणीपेक्षा कमी झाला आहे.
तालुकानिहाय मागणी व मंजूर साठा (मे. टन)
तालुकामागणीमंजूर साठा
औरंगाबाद ३२,२३०२४,२८८
पैठण२९,३००२२,०८०
गंगापूर४१,०२०३०,९१२
वैजापूर४६,८८०३५,३२८
कन्नड४१,०२०३०,९१२
खुलताबाद१४,६५०११,०४०
सिल्लोड४३,९५०३३,१२०
सोयगाव२०,५१०१५,४५६
फुलंब्री२३,४४०१७,४५६
एकूण२,९३,०००२,२०,८००
खताचा साठा पुरेल
मागच्या वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात खताला कमी उठाव होता. त्यामुळे काही खत शिल्लक आहे. त्यामुळे खरिपात खताचा साठा पुरेल असे वाटते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. जी. पडवळ म्हणाले.